पुणे – वैदिक परंपरा मानणाऱ्या शत्रूंनी आणि राज्यकर्त्यांनी आपल्याला जातींमध्ये वाटले. आपल्याला केवळ तोडले असे नाही, तर जातीचा अभिमान बाळगायला शिकवले. केंद्र आणि राज्यातील सरकार आपल्या मूर्खपणाच्या बळावर सत्तेत आहे. त्यामुळे हे भेदाभेद सारून आपण एकत्र आलो, तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता आपण प्रस्थापित करू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी सोमवारी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. मनोहर यांना “महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमल ढोले-पाटील, लेखक हरी नरके, परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे यावेळी उपस्थित होत्या.
“”जोतिराव फुले यांची पुण्यतिथी नसतेच. केवळ जयंती असते. ते तुमच्या आमच्यातच आहेत, ते रोजच जन्माला येतात. या देशात चुकीच्या श्रद्धांची आणि दैवतांची मंदिरे आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची तत्त्वे घेऊन जगणारा मी मनुष्य असून, त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन मी कुठलेही पुरस्कार स्वीकारणार नाही. ज्या व्यासपीठावर यांच्या प्रतिमा लावल्या जाणार नाहीत, ते व्यासपीठ माझे नव्हे. यासाठी कोट्यवधींचे पुरस्कार, मानसन्मान मला नाकारावे लागले तरी मी ते नाकारेन.”
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत. सहा डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणाऱ्या अनुयायांना आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही. मग आपल्याच समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारतर्फे हजारो कोटी रूपये दिले जातात, मग हाच न्याय भिडे वाडा स्मारकासाठी का नसतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महात्मा फुले वाडा ते सावित्रीबाई फुले सभागृह हा रस्ता जोडून का मिळत नाही, हा देखील प्रश्न आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी हजारो महिला स्वयंस्फूर्तीने जमा होतात.
परंतु, त्याच मंदिरासमोरील भिडे वाडा येथे माथा टेकण्यासाठी कोणीही जात नाही. शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई यांच्यापेक्षा दोरे गुंडाळण्यासाठी सावित्री महिलांना महत्त्वाची वाटते, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.
आम्हाला सरस्वतीचे पूजन अमान्य- भुजबळ
“तुम्हाला’ पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करत नाही, याचा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला. सरस्वतीपेक्षा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा गावागावापर्यंत नेली. त्यामुळे ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असेही भुजबळ म्हणाले.