तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – महिलांचे समाजातील स्थान हे सर्वोच्च आहे. परंतु शिक्षण, व्यावसायिक जगातील तिचे पाऊल आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान यामुळे आधुनिक काळातील महिला अधिक आत्मनिर्भर झाली असल्याचे मत प्रा.विजय नवले यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. विलास देवतारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.जावेद शेख, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. शेखर रहाणे यांचेही मार्गदर्शन लाभले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम पार पडला. त्यावेळी महिलांचे सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. विजय नवले बोलत होते.
प्रा. नवले म्हणाले की, महिलांनी आज सर्व क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. चिकाटी आणि कष्टाळू वृत्ती यामुळे महिलांनी शिक्षण, आरोग्य, कला, शासकीय नोकरी, व्यवसाय, बँकिंग, सेवा क्षेत्र, संगणक, विज्ञान, अभियांत्रिकी अशा विविध कार्यक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यानंतर डॉ. अश्विनी पवार यांनी महिलांच्या आरोग्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व, शारीरिक ऊर्जा, हार्मोनल संतुलन, निरोगी पौष्टिक आहार आदी बाबींनविषयी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुनीता येवले, प्रा. सारिका पाटील, अंकिता डोके, वैष्णवी नरळे, श्रद्धा येवले, रुपाली गवळी यांनी केले.