पिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी)- राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र अलंकापुरीतील इंद्रायणीनदीपात्राचे प्रदूषण बारामाही सुरू आहे. आळंदी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल आरडाओड करणारी आळंदी नगरपरिषद मात्र स्वत:च नदीपात्रात थेट सांडपाणी सोडत आहे. त्यामुळे आता इंद्रायणीचे तीर्थ पिण्यास भाविक धजावत नाहीत. केवळ वारकरी ध्वजाच्या इंद्रायणीनदी स्नानावर समाधान मानत आहेत.
नदीपात्र की कार वॉशिंग सेंटर?
आळंदीत येणाऱ्या महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची संख्या लक्षात घेत, नदीपात्राच्या दोन्हीकडील पात्रालगत चारचाकी वाहन विनासायास जाऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ओळखीचा फायदा घेत, अनेक जण या मार्गावरून चारचाकी वाहने थेट इंद्रायणीनदीपत्रात धुवण्यासाठी आणत आहेत. दररोजच्या कपडे धुण्यामुळेदेखील प्रदूषणात भरच पडत आहे. या वाहनचालकांना कोणीही अटकाव करताना दिसत नाही.
नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी
आषाढी, कार्तिकीवारीला राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असता. याशिवाय महिन्याचे व पंधरा दिवसाची एकादशी तसेच गुरूवार, सार्वजनिक सुटट्यांना हजारो भाविक येत असतात. माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनाबरोबरच इंद्रायणी नदीचे तीर्थ प्राशन करण्याची परंपरा आहे. मात्र नगरपरिषदेच्या वतीने मोठ्या आकाराच्या पाईपमधून नवीन पुलालगत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी पिण्यास योग्य नसल्याचे फलक खुद्द आळंदी नगरपरिषद प्रशासनानेच घाटावर लावले आहेत.
बंधाऱ्याला अडकली जलपर्णी
पाणीपुरवठा करनारा बंधारा व नवीन पुलानजीक केटी बंधाऱ्याला अडकते. यंदादेखील ही जलपर्णी केटी बंधाऱ्यानजीक अडकली होती. मात्र. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ही जलपर्णी बंधाऱ्यावर अडकली आहे. परिनामी अलंकापुरीच्या सौंदर्यास ही जलपर्णी बाधा ठरत आहे.
पात्रालगत धोकादायक वाहतूक
आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याजवळ बांधलेल्या पुलामुळे थेट चाकण-आळंदी रस्त्याकरिता तर नदीपात्राला समांतर असलेल्या रस्त्याने डुडुळगावला जाण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपुर्वी आलेल्या पुरामुळे बंधाऱ्यालगतचा भराव वाहून गेला आहे. त्यानंतर याठिकाणाहून वाहतूक होऊ नये, याकरिता लाकडे बांधून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील याठिकाणाहून वाहनांची धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरूच आहे. याठिकाणी एखादी अप्रिय घटना घडण्याची वाट न पहता याठिकाणी भराव टाकण्याची स्थानिकांची मागणी आहे.