राजगड, (प्रतिनिधी) – जेमतेम पन्नास हजाराचे आसपास मतदार संख्या असलेला जुना वेल्हे तालुका व सध्याचा राजगड तालुका आहे. येथील राजकारण आतापर्यंत झालेल्या लोकसभा, विधानसभा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नेहमीच माजी मंत्री अनंतराव थोपटे व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्याभोवतीच फिरलय. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत कोणते महायुती व महाविकास आघाडी मतदारांना वळविण्यात आघाडी घेतात, हे काळच ठरवेल.
पूर्वीची एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ही नेहमीच गटातटात विभागली गेली होती. त्यामुळे त्यांना कधीच थोपटे कुटुंबीयांच्या वर्चस्वाला धक्का देता आला नाही. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ही खासदार सुप्रिया सुळे यांची ताकद असून आ. संग्राम थोपटेंच्या गावागावात प्रचार फेऱ्या सुरू आहेत.
यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यातील डझनभर नेते घेऊन या निवडणुकीस सामोरे जात असून. या नेत्यांची एकसंघ ताकद दिसत असली तरी ती सुनेत्रा पवार यांना कितपत आघाडी मिळवून देणार हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दबदबा व करिष्मा सर्वत्र ज्ञात आहे. त्यांनाही मानणारा मतदार या विधानसभा मतदार संघात आहे. त्याहीपलीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी, जिल्हा बँक, दूध संघ व अन्य आर्थिक संस्थांचे संचालक यांची मोठी फळी त्यांच्यासमवेत आहे. त्यामुळे ही लढत म्हणावी इतकी सोपी नाही. सर्व आघाड्यांवर अजित पवार गटही वरचढ ठरत असून त्यांचेही कार्यकर्ते प्रचारात जोमाने उतरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होण्याअगोदरच प्रचारात रंगत आली आहे.
वास्तविक पाहता नणंद भावजय अशी असलेली ही लढत तशी न राहता ती शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि देवंद्र फडणवीस यांच्या मतानुसार ती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच रंगली आहे. ती जरी देशपातळीवर गाजणारी लढाई असली तरी भोर विधानसभा मतदार संघात मात्र आ. संग्राम थोपटे ठरवतील तेच धोरण अशीच सध्यातरी परिस्थिती आहे.
त्यांचीच यंत्रणा निर्णायक राहणार असल्याचे जाणकार सांगतात. पन्नास वर्षाच्या थोपटे कुटुंबीयांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये वेल्हे तालुक्याने नेहमीच थोपटे कुटुंबाला भरभरून मते दिली. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे यांचाच शिक्का चालणार का.. ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जुना वेल्हे व आताच्या राजगड तालुक्याच्या विकासासाठी आ. संग्राम थोपटे यांनी गावागावांमध्ये निधी दिलेला आहे. त्यामुळे गाव खेड्यांमध्ये थोपटे यांना मानणारा वर्ग असून येत्या लोकसभा मतदानामध्ये याचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल.
– अमोल पडवळ, सरपंच शिरकोली (ता. राजगड)
ही निवडणूक भारताचे भविष्य घडविणारी असून उद्याचा बलशाली व विकसित भारत घडविण्यासाठी लोक या निवडणुकीत नरेंद्र मोदींकडे पाहून त्यांना मतदान करतील. इथे स्थानिक मुद्द्यांपेक्षा देशपातळीवरील निर्णय महत्त्वाचे असून देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे करीत आहेत. त्यामुळे यावेळी बारामतीत परिवर्तन नक्की होणार.- आनंद देशमाने, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी (ता. राजगड)
भोर विधानसभा मतदार संघात आ. संग्राम थोपटे यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुर्गम राजगड, भोर, मुळशी तालुक्यामध्ये त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत थोपटेंच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. -विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते केळद (ता. राजगड)
या निवडणुकीच्या माध्यमातून आ. संग्राम थोपटे हे आपले वर्चस्व प्रस्थापित करतानाच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना विरोध करणाऱ्यांना ते कात्रजचा घाट दाखविण्याच्या तयारीत आहेत. एका दगडात दोन पक्षी मारतानाच आपल्या विरोधकांना कमजोर करण्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. – संजय लिम्हण, माजी सरपंच गुंजवणे (ता. राजगड)