विठ्ठल लांडगे
नगर – नगर जिल्हा सहकारी बँकेत अखेर राजकीय जोडे बाजूला ठेवून जिल्ह्यातील नेत्यांनी सहमतीच्याच राजकारणाला पसंती दिल्याचे उघड झाले आहे. राज्यातील वरिष्ठांनीही याच राजकीय गणितांना मूक संमती देत थेट बिनविरोध निवडींसाठी मोठीच भूमिका घेतली. आता अवघ्या चारच जागांची निवडणूक होत आहे. त्यातही स्थानिक राजकारण आडवे आल्याने नेत्यांची येथे कोंडी झाली, असेच चित्र आहे.
जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होईल, असे चित्र सुरुवातीला रंगविण्यात आले. मात्र, अखेरीस महसूलमंत्री थोरात गटाने पारंपरिक विरोधी गट मानल्या गेलेल्या माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे नव्हे, तर थोरात यांचेच वर्चस्व शाबित असल्याचे दाखवून दिले आहे.
जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीसाठी विखे गटाची धुरा आज खासदार डॉ. सुजय विखे यांनी विळदमधून, थोरात गटाची धुरा स्वत: महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या बंगल्यातून चालविली. राष्ट्रवादीकडूनही माजी आमदार चंद्रशेखर घुले व आमदार संग्राम जगताप यांनी मोठीच भूमिका बजावली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यातून माजी आमदार नरेंद्र घुले पाटील या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांत थेट भाजपत असलेल्यांची संख्याही दिसते. तथापि, ते थोरात गटाशी जवळीक साधून असल्याने बँकेत दाखल झाले आहेत. अकोल्यातून विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर यांना पुन्हा संधी दिली. मात्र, स्थानिक राजकारणात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून गायकर विरोधकांना शांत केले. त्यात आज पिचड यांची कोंडी करण्याची त्यांची व्यूहरचना होती, हे आज उघड झाले. माजी आमदार वैभव पिचड यांची माघार, हेच राष्ट्रवादीचे यश मानले जात आहे.
संगमनेरातून महसूलमंत्री थोरात यांच्या विरोधात जाण्याचे धाडस विरोधकांनी केले नाही. राहात्यातून विखेंच्या विरोधात जाण्याचे कुणाचे धाडस नसल्याने दोन्ही सेवा सोसायटी बिनविरोध होण्यात काही विशेष नाही. कोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती दोघांनाही संधी, अशाच मुद्यावर झाली, हे आज स्पष्ट झाले.
श्रीरामपूरमधूनही करण ससाणे यांना संधी देतानाच भानुदास मुरकुटे यांनाही बँकेत आणून विखे-थोरात यांनी येथे सहमतीचे राजकारण स्पष्ट केले.
नेवशात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना अपेक्षेप्रमाणे संधी देऊन शिवसेनेलाही थोरात यांनी जागा दिल्याचे भासविले. शेवगावमधून चंद्रशेखर घुले आणि पाथर्डीतून मोनिका राजळे यांना संधी देताना येथेही थोरात गटाची सरशी स्पष्टपणे दिसते. राहुरीतून अरुण तनपुरे यांना संधी मिळाली. नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेत येथे थोरात गटाच्या बेरजेचे राजकारण केले.
नगर तालुक्यात 90 टक्के मतदार आपल्या बाजूला असल्याचे सांगणार्या माजी मंत्री व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांना स्वत:ची निवड बिनविरोध करता आली नाही. येथे स्थानिक राजकारणाचा आणि पारंपरिक विरोधाचा त्यांना सामना करावा लागत आहे. जामखेडमध्ये थेट विखे व पवारांचेच एकमत झाले. त्यामुळे येथील राजकारणात स्थानिक नेते माजी मंत्री राम शिंद यांची भविष्यातील कोंडी कायम ठेवण्यात आली आहे.
श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांची सहमती एक्सप्रेस कामाला आली. त्यामुळे थोरात गटाने येथेही सरशी केली. आमदार बबनराव पाचपुते यांचा उमेदवार ऐनवेळी जगताप यांच्या वाहनात बसल्याने पाचपुते यांची येथे कोंडी झाली. पारनेर व कर्जतच्या राजकारणास स्थानिक कंगोरे असल्याने तेथील उमेदवारांची मळी काढण्यात नेत्यांना यश आलेच नाही, असे सांगितले जात आहे. दरम्यान, आताही उर्वरित चार जागांच्या निवडणुकीत पुन्हा थोरात विरुद्ध विखे गट, अशीच सरळ लढत होईल, असे चित्र आहे.
आमदार संग्राम जगताप यांना राज्यस्तरावर संधी..!
जिल्हा सहकारी बँकेत दोन टर्म संचालक असलेल्या आमदार अरुणकाका जगताप यांना ऐनवेळी थांबावे लागले आहे. मात्र, त्यांच्या माघारीतून आमदार संग्राम जगताप यांना थेट राज्यस्तरावर संधी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.