भाऊ ठाकूर
राहू -दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील दशक्रियेचा विधी हा राजकीय कार्यक्रम होत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये गाव पुढाऱ्यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. या नवीन गाव पुढाऱ्यांना दशक्रिया विधीचा कार्यक्रम म्हणजे एक राजकीय व्यासपीठ झाले आहे की काय, अशी शंका येत आहे. या राजकीय समीकरणात नातेवाईक, कुटुंबीयांना काकस्पर्शाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एखाद्या मोठ्या गावात तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अलिकडे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. श्रद्धांजली वाहण्याच्या नावाखाली आपल्या नेत्यांचा, पार्टीचा नामोल्लेख करण्याची कोणतीही संधी हे नेते सोडत नाहीत. ज्यांचा दशक्रिया विधी आहे. त्या कुटुंबाच्या दु:खापेक्षा आपले राजकीय अस्तित्वच दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे होत असताना संबंधीत कुटुंबातील व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे, हे देखील न पाहता भाषणात चुकीचा उल्लेख केला जात आहे. मृत व्यक्तीचा जीवनपट येथे उलगडण्याचा येथे प्रयत्न केला जातो. हे होत असताना कोणतीही माहिती न घेता चुकीचा उल्लेख केला जातो. ती व्यक्ती कशी महान होती, त्यांनी आयुष्यात किती कष्ट केले हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो.
स्मशानभूमीत दशक्रिया विधीला गेल्या दहा ते बारा वर्षांत राजकीय व्यासपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी मोठ- मोठी श्रद्धांजलीवर भाषणे ठोकली जातात. मोठा स्पिकरवरून नेत्यांच्या लांबलचक भाषणामुळे आवाज परिसरात घुमला जात आहे. त्यामुळे दशक्रिया विधींचा काकस्पर्श देखील लांबला जात आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या पाहूण्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.