विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही मतदारसंघांमध्ये पितृपक्षामुळे शुकशुकाट होता. मात्र, शनिवारी सर्वपित्री अमावस्येने पितृ पंधरवडा संपत असल्याने रविवारपासून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा “फिवर’ चढण्यास सुरूवात होणार आहे. अनेकांनी मनात इच्छा असूनही प्रचाराचा शुभारंभ टाळत या आठ दिवसांत केवळ नेत्यांच्या भेटीगाठी आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या भेटींवर भर दिला आहे. तर अनेकांनी या आठ दिवसांत शांत राहणेच पसंत केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. 21 सप्टेंबर रोजी जाहीर झाली. मात्र, त्यानंतरही पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीचे वातावरण तापले नाही. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ भाजपने जिंकले. तर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढण्याची चिन्हे असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्ष आघाडीत लढणार आहे. तर मनसेनेही शहरातील चार ते पाच जागांसाठी लढण्याची तयारी केली आहे.
मात्र, अद्याप युतीतील जागा वाटप अंतिम झालेले नाही. तर आघाडीचे पुण्यातील जागा वाटपाचे सूत्र निश्चित असले, तरी दोन्ही पक्षांनी पितृ पंधरावड्यामुळे अद्याप आपले उमेदवार, तसेच जागा वाटपाचे सूत्रही गुलदस्त्यात ठेवले आहे. तर मनसेनेही उमेदवार निश्चित केले असले, तरी याच कारणामुळे यादी जाहीर केलेली नाही. त्याच वेळी आम आदमी पक्षाने शहरात दोन तर वंचित बहुजन आघाडीने तीन आणि एमआयएमने आपल्या एका उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप जाहीर प्रचाराला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे अमावस्या संपताच तातडीने कामाला लागण्याचे नियोजन सर्वच इच्छुकांकडून शहरात करण्यात आले आहे.
अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि.27 सप्टेंबर ते दि. 4 ऑक्टोबरचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही अमावस्या संपल्यानंतर इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी मिळणार असला, तरी त्यात दोन दिवस शासकीय सुट्टी असणार आहे. त्यामुळे सोमवारपासूनच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
प्रमुख पक्षांच्या याद्या जाहीर होणार
रविवारपासूनच सर्व प्रमुख पक्षांच्या शहरातील याद्या जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून पुण्यात विद्यमान आमदारांच्या तिकिटांमध्ये बदल होणार नसल्याचे सांगितले जात असून रविवारी किंवा सोमवारी उमेदवारी याद्या जाहीर होतील, असे सांगण्यात आले. तर मनसेकडूनही यादी तयार असून अमावस्या संपताच ती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही शहरातील उमेदवारांची यादी तयार असून सोमवारपर्यंत ती जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत याद्या जाहीर होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार असून वातावरण तापणार आहे.