कातरखटाव – बोंबाळे (ता. खटाव) येथील स्मशानभूमी निवारण शेडची गेली अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली असून ढासळलेल्या अवस्थेतील शेड अजून किती वर्षे मरण यातना सोसणार, असा प्रश्न बोंबाळे ग्रामस्थांना पडला आहे.
या स्मशानभूमी शेडला मोठे भगदाड पडले असून अंत्यसंस्कार विधीला आलेल्या ग्रामस्थांना निवारा नाहीच. परंतु शेड ढासळण्याची भीती वाटत राहते. या कामासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडातून निधी वापरून काम पूर्ण केले जाऊ शकते, असे असताना अनेक वर्षे काम रखडले आहे.
निधी येतो की नाही, मंजूर आहे की पाठपुरावा केलाय की निधी परत जातोय, अशा गोंधळात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकामासाठी आणलेली वाळू, दगड, कधीच गायब झाली आहे. स्मशानभूमीच्या दुर्दशेमुळे पावसाळ्यात व रात्रीअपरात्री अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
सावडायला आल्यानंतर महिलांना, वृद्धांना, काही काळ का होईना पण त्रास सहन करावा लागत आहे. गावची लोकसंख्या 1600 ते 1700 असून गावात अनेक राजकीय मात्तबर आहेत. गावाने एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. असे असताना गेली आठ- दहा वर्षे स्मशानभूमी शेडची दुर्दशा का झाली, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. लवकरात लवकर ग्रामपंचायतीने व संबंधित खात्याने ढासळलेल्या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या ग्रामपंचायतीला निवारण शेडसाठी निधी आलेला नाही. निधी मंजूर झाला पाहिजे. प्रत्येक मिटिंगला पाठपुरावा केला जात आहे.
– शरद नलवडे, ग्रामपंचायत सदस्य, बोंबाळे.