कामशेत – जलजीवन मिशन अंतर्गत बौर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून सुमारे 1 कोटी 74 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 27) महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके, “पीएमआरडीए’च्या सदस्य व कार्ला गावच्या सरपंच दीपाली हुलावळे, बौर गावचे सरपंच संदीप खिरीड, उपसरपंच मंगल मगर, ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे, प्रवीण भवार, प्रमिला वायभट, आश्विनी दळवी, साधना भवार, सावित्रीबाई दाभाडे, संदीप दळवी, कल्याणी काजळे, माजी सरपंच मारुती वाळूंज, माजी उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, शिवणे-सडवलीचे सरपंच अजित चौधरी, चिखलसेचे सरपंच सुनील काजळे, राष्ट्रवादी पश्चिम मावळ तालुकाध्यक्ष हनुमंत खिरीड, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश वाळुंजकर, कल्पेश मराठे, मयूर नाटक, ग्रामसेवक अमोल कोळी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
बौरगाव व बौरवाडी या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावात पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेची नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी बौर गावातील नळपाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 1 कोटी 74 लाख रुपयांचा निधी जलजीवन मिशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून बौर गावातील पवना नदीलगत 15 मीटर खोल व 8 मीटर व्यास असलेली एक विहिर, 20 हजार लिटर व 68 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन पाण्याच्या टाक्या बनविण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 15 किलोमीटर लांबीची पाईप लाइन देखील करण्यात येणार आहे. यामुळे गावातील अनेक वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.
बौर गावात राबविण्यात येत असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेमुळे बौर गावातील अनेक वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी बौर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदारांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो.
– संदीप खिरीड, सरपंच
मावळ तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांसाठी आमदारांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु या निधीच्या माध्यमातून होणारी विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घ्यावी.
– सारिका शेळके,
अध्यक्षा, कुलस्वामिनी महिला मंच.