कॉंग्रेसचे अवतारकार्य संपले असून, तिचे विद्यमान स्वरूप बदलून पक्षाचे रूपांतर लोकसेवक संघात करावे, असे आवाहन आपल्या मृत्यूपूर्वी तीन दिवस अगोदर महात्मा गांधींनी केले होते. 2014 साली देशभर कॉंग्रेसचा बोऱ्या वाजला. त्यानंतर, कॉंग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे कुत्सित उद्गार भाजप नेते काढू लागले. कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीच होती; परंतु ती पूर्ण करण्यासाठी भाजपपेक्षा कॉंग्रेसच प्रयत्न करत आहे की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे! राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून वीज बिलाची थकबाकी व अनुदान मिळत नसल्याची तक्रार ऊर्जामंत्री व कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली होती.
मात्र, वीज थकबाकीचे संकट हे भाजपचे पाप असून, ऊर्जामंत्र्यांनी केलेले विधान बरोबर नाही, असा घरचा आहेर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. पटोले यांचा ऊर्जा खात्यावर डोळा असून, त्यांना मंत्रिमंडळात जाऊन ते खाते हातात घ्यायचे आहे. गेल्या काही दिवसांत पटोले यांनी मोदींविरुद्ध बेफाम वक्तव्ये करून, टीकेचे मोहोळ अंगावर ओढवून घेतले होते. आता मालेगावमध्ये कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख शफी आणि शहरातील 27 नगरसेवक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे असूनही, गेल्या दोन वर्षांत मालेगाव शहरासाठी विजेच्या संदर्भात कोणताही अनुकूल निर्णय झाला नाही.
विविध योजनांसाठी विकासनिधी आणण्यात कॉंग्रेस मंत्री अयशस्वी झाले, म्हणून आपण पक्ष सोडला, अशी तक्रार नगरसेवकांनी केली आहे. यामुळे चिडून जाऊन, आम्हीही अशीच फोडाफोडी करून बदला घेऊ, असा थयथयाट पटोले यांनी केला आहे. तिकडे पंजाबात कॉंग्रेसच्या निम्म्यापेक्षा अधिक खासदारांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली असून, त्यात माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याच टीममधील सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. “लड़की हूँ लड़ सकती हूँ’ या घोषणेच्या पोस्टर्सवर ज्या मुलीचे चित्र होते,
ती प्रियंका मौर्यच तिकीट न मिळाल्यामुळे भाजपात गेली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे मेहुणे आणि समाजवादी पार्टीचे आमदार प्रमोद गुप्ता हेही भाजपात दाखल झाले आहेत. मुलायमसिंह यांची सून अपर्णा यादव हीदेखील भाजपात गेली आहे. कॉंग्रेसची स्थिती इतकी केविलवाणी झाली आहे की, अन्य पक्षातून कॉंग्रेसमध्ये फारसे कुणी दाखल व्हायलाच तयार नाही. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न नेतृत्वाकडून सुरू असतानाच, गांधी कुटुंबाचे आणि विशेषतः राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी नेते आरपीएन सिंह यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गमतीची गोष्ट म्हणजे, कॉंग्रेसने उत्तर प्रदेशसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिंह यांचा समावेश करण्यात आला होता.
त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतले. गेली 32 वर्षे मी कॉंग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले, पण आता तो पूर्वीचा राजकीय पक्ष राहिलेला नाही, अशी टीका सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. सिंह यांना 2009 मध्ये कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले व ते खासदारही बनले. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या पर्वात ते मंत्रीही होते. झारखंड मुक्ती मोर्चा व कॉंग्रेसचे आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंह यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. सिंह हे कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते आणि मोदी यांच्यावरील राहुल गांधींच्या व्यक्तिगत टीकेवरून सिंह यांचा त्यांच्याशी खटकाही उडाला होता. उत्तर प्रदेशातली विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत सिंह यांचा समावेश नव्हता आणि ते प्रियंकांच्या चमूतही नव्हते.
वास्तविक अल्पकाळात पक्षात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळूनही, सिंह यांच्यासारख्या करियरिस्ट नेत्यांचे समाधान होत नाही. अलीकडील काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, ललितेशपती त्रिपाठी हे राहुल ब्रिगेडमधील नेते कॉंग्रेसमधून निघून गेले आहेत. त्या अगोदरच्या टप्प्यात रिटा बहुगुणा जोशी, चौधरी वीरेंद्र सिंह, हिमंत बिस्वाशर्मा, खुशबू, टॉम वडक्कन, प्रियंका चतुर्वेदी, ऊर्मिला मातोंडकर यांनीही कॉंग्रेसचा त्याग केला आहे. जे जे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्यांना सत्तेबाहेर राहण्याची सवय नाही किंवा मोदी-शहांशी दोन हात करण्याची निर्भयता त्यांच्याकडे नाही. तेव्हा ज्यांना जायचे असेल, त्यांनी खुशाल जावे, असा राहुल यांचा पवित्रा आहे. तत्त्वतः तो चुकीचा नाही.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत नोटाबंदी, जम्मू-काश्मीर, चीनची घुसखोरी या विषयांवरून मोदींवर सातत्याने टीका करणारे आरपीएन सिंह यांनी एकदम पलटी खाऊन, मोदी सरकार हे विकासवादी असल्याचे म्हटले आहे. यावरून त्यांच्यासारखे नेते किती लबाड आहेत, हे स्पष्ट होते. परंतु तरीदेखील सध्या राजकारणात अशाच व्यवहारवादी मंडळींची बहुसंख्या असणार, हे गृहीत धरूनच कॉंग्रेसने आपले नेते व कार्यकर्ते सांभाळून ठेवले पाहिजेत. पक्षात निर्णय तातडीने घेतले जातात, गाऱ्हाण्यांची दखल घेतली जाते अन् त्यावर ताबडतोब तोडगाही काढला जातो, असा विश्वास अन् संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेला पाहिजे, अन्यथा ओसाडगाव हीच कॉंग्रेसची जहागिरी ठरेल!