नवी दिल्ली – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोना संकटाला आळा घालण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन लागू करण्यात आला असून यामुळे अनेक देशांमधील नागरिक इतर देशांमध्ये अडकून पडले आहेत. भारताने आपल्या नागरिकांना स्वदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु केली असून या अंतर्गत हजारो नागरिकांना भारतात आणण्यात आलंय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणताना कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून याचीच प्रचिती एका घटनेद्वारे आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एअर इंडियाचे एक विमान दिल्लीहून मॉस्कोला निघालेले होते. कागद पत्रांची उलट तपासणी करताना या विमानाचा एक पायलट कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले मात्र तोपर्यंत हे विमान उझबेकिस्तानच्या हवाई सीमेमध्ये पोचले होते. परंतु झालेल्या चुकीवर पांघरून घालण्यापेक्षा एअर इंडियाने हे विमान परत बोलावून घेतले.
हे विमान प्रवाशांना भारतामध्ये परत आणण्यासाठी निघाले असल्याने यात एकही प्रवाशी नव्हता. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांना आता नियमाप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले आहे. विमान मॉस्कोमध्ये लँड करण्यापूर्वीच आपली चूक एअर इंडियाच्या लक्षात आल्याने व विमानाला परत बोलावण्याचा निर्णय त्वरित घेतला गेल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.