लोकशाहीमध्ये मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या यांचे गुणोत्तर नेहमीच अचंबित करणारे असते. मात्र, तरीही सत्ताधारी पक्षावर टीका करण्यासाठी विरोधक मतांच्या टक्केवारीचा दाखला देत असतात. प्रत्यक्षात सत्तेचे गणित हे जिंकलेल्या जागांनुसार ठरत असते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 31 टक्के मते मिळवणाऱ्या भाजपाने 282 जागांवर विजय मिळवत बहुमताचे सरकार स्थापित केले. या निवडणुकांत कॉंग्रेसला 19.52 टक्के मते मिळाली होती.
गंमत म्हणजे गेल्या 16 लोकसभा निवडणुकांमध्ये अनेकदा असे झाले आहे की मिळालेल्या मतांची टक्केवारी कमी असूनही त्या पक्षाने सरकार स्थापन केले आहे.
1996 मध्ये केवळ 20.29 टक्के मते मिळालेल्या भाजपाच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्ताधीश झाले होते. 2004 मध्ये कॉंग्रेसनेही 26.53 टक्के मते मिळवत सरकार स्थापन केले होते. 1989 मध्ये कॉंग्रेसला 39.5 टक्के मते मिळाली होती. पण तरीही 17.8 टक्के मते मिळवणाऱ्या जनता दलाच्या व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत आले. 1996 मध्ये 28.80 टक्के मते मिळवणाऱ्या कॉंग्रेसच्या जागी 20.29 टक्के मते मिळालेल्या भाजपाने अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालील सरकार बनवले.