कवठे (वार्ताहर) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वेळे (ता. वाई) येथे मार्च महिन्यात येऊन गेलेल्या 65 वर्षीय पुरुषाला मुंबईत करोनाची बाधा झाल्याने तालुक्यात प्रशासनाची धावपळ उडाली. त्यामुळे वेळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले असून तेथील परिसर सील करण्यात आला आहे.
संबंधित रुग्ण मार्च महिन्यात मुंबईहून वेळे येथे शेतीकामासाठी आला होता. गावी आल्यावर थोडा थकवा जाणवू लागल्याने त्याला वेळे येथील एका खाजगी दवाखान्यात नेले होते. तेथून त्याला सातारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन हा रुग्ण चिंचणेर निंब येथे नातेवाइकाकडे गेला होता.
तेथून दुसऱ्या दिवशी तो पुन्हा सातारा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल झाला होता. त्याचे कुटुंबीय मुंबईत असल्याने त्याला साताऱ्यातून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. त्याबाबत रितसर परवानगी त्याच्या कुटुंबाने घेतली होती. मुंबईला गेल्यानंतर त्याची तब्येत खालावल्याने त्याची करोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल 3 मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने तो करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
ही माहिती समजताच वाईचे तहसीलदार रणजित भोसले, भुईंजचे सपोनि शाम बुवा, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी गावात धाव घेतली. या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या चार जणांना वाईतील किसनवीर महाविद्यालयात संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळेच्या परिघातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.