नवी दिल्ली: दिल्लीत अजून करोनाचा सामाजिक संसर्ग झालेला नाही पण करोनाग्रस्तांचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तर दिल्लीत जुलै महिन्यापर्यंत करोनाच्या साडे पाच लाख केसेस उद्भवू शकतात अशी भीती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे.
आज येथे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नायब राज्यपाल अनिल बैजल हे होते.
दिल्लीत अजून सामाजिक संसर्ग झालेला नाही अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनीही दिली असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीतील रहिवाशांनाच उपचार देण्याचा जो आदेश राज्य सरकारने काढला आहे तो आदेश राज्यपाल बैजल यांनी रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे सध्या बैजल आणि केजरीवाल सरकारमध्ये पुन्हा संघर्ष उद्भवला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलावण्यात आली होती.