मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात सोमवारी करोनाच्या 120 नवीन रुग्णांची भर पडल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या 868 वर पोहोचली आहे. तर 70 करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 हजार 563 नमुन्यांपैकी 15 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात 175 सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 214 टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात 178 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयात 71 तर बुलढाणा जिल्ह्यात 147 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2855 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
सोमवारी 7 जणांचा मृत्यू
आज राज्यात 7 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 4 जण मुंबईतील, प्रत्येकी 1 जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे.