नवी दिल्ली- करोनाव्हायरसमुळे देशभरात लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात याबाबत काही संदिग्धता होत्या. त्यामुळे देशभरातील जिनावश्यक मालवाहतुकीची पुरवठासाखळी खंडित झाली आहे. ही पुरवठासाखळी लवकर पूर्ववत होण्याची गरज आहे. त्याकरिता अशा ट्रक चालकांना आणि मालाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांना काम करू द्यावे अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारना केले आहेत.
बऱ्याच काळापासून वाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हा पुरवठा राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर सुरळीत होण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रातील काम करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला आणि कामगारांना काम करू द्यावे असे ग्राहक व्यवहार सचिव पवन कुमार अग्रवाल यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात एका अधिकार प्राप्त यंत्रणेची गरज असून ही यंत्रणा राज्यातील पोलीस दलाबरोबर वाहतुकीबाबत समन्वयाचे काम करू शकेल, असे सुचविण्यात आले आहे.
कोणती वाहतूक राज्यांतर्गत करण्याची गरज आहे आणि कोणती वाहतूक आंतरराज्य करण्याची गरज आहे याकडे ही यंत्रणा लक्ष देऊ शकेल. स्थानिक पातळीवरील पोलिस हे एक ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्याबरोबरचा कामगार ट्रक पर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतील.
जीवनावश्यक वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्यांनी त्यांना मालाची चढ-उतार करण्यास कामगार मिळत नाही. त्याचबरोबर या मालाची वाहतूक करण्यास ट्रक आणि ट्रक चालक मिळत नाहीत असे सांगितले आहे. जर परिस्थिती अशीच काही काळ निर्माण झाली तर त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यासाठी याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.