मुंबई: देशात करोनाचा प्रसार वेगाने होत असून रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. त्यातच सर्वाधिक बिकट परिस्थिती ही राज्यात आहे. एकट्या महाराष्ट्रात करोनाचे 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त मुंबईत आहे. दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाच सदस्यीय टीमने असा अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42 हजारावर करोना प्रकरणांची नोंद होईल. तर हा आकडा 15 मेपर्यंत 6 लाख 56 हजारावर जाण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची गणिती मॉडेलिंगच्या आधारे जाहीर केली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 13 हजार 636 व्हेंटिलेटर आणि 4 लाख 83 हजार आयसोलेशन बेडचा अभाव असेल. त्यामुळे येत्या काळात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास राज्य सरकारपुढे मोठ्या समस्या असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आंतर-केंद्रीय मंत्रालय संघांकडे राज्यातील आकडेवारी सादर केली. यातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी आणि या आकडेवारीत विसंगती दिसून आली.
आरोग्य कर्मचारी नेमण्याची सूचना
केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध करुन देण्यास सांगितले. तसेच आरोग्य कर्मचारी आणि नोडल अधिकारी नेमण्याची सुचना केली आहे. या संदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. तसेच प्रदेश आणि जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त करावी. जे वैद्यकीय व्यावसायिकांच्या कामकाजावरील कोणत्याही सुरक्षिततेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतील.