शासनाच्या हालचालींनी विद्यार्थी, शिक्षक संभ्रमात : कर्मचारी महासंघ आक्रमक
पुणे – राज्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससीव्ही) बंद करण्याचा अथवा त्याचे रुपांतरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला असून हे अन्यायकारक आहे. प्रशासनाने संस्था व संघटना यांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाने दिला आहे.
सन 1988 पासून शासनाने सेवा प्रवेश नियमात सुधारणा केल्या नाहीत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुरेसा रोजगार, शिकाऊ उमेदवारी मिळत नाही व कमी प्रमाणात विद्यार्थी स्वयंरोजगाराकडे वळतात, असा ठपका ठेवून हा अभ्यासक्रम बंद करण्याच्या हालचाली शासनाने सुरू ठेवल्या आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाने सतत उच्च माध्यमिक शाळांकडून कोणती ना कोणती माहिती मागवण्याचा धडाका लावण्यात आला आहे.
अनेकदा तपासण्याही झाल्या आहेत. तरी पुन्हा तपासण्याचा दम भरला जात आहे. यामुळे डोकेदुखी वाढली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांना द्वीलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या दृष्टीने विकल्प देण्यासाठी व विद्यार्थ्यांकरीता रोजगार, स्वयंरोजगार विषयीचे कल जाणून घेण्यासाठी या शिक्षण संस्थांना भेटी देण्याचा कार्यक्रम पूर्ण करुन त्याबाबतचा अहवाल शासनास 6 डिसेंबर 2019 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. तो अहवालही प्राप्त झालेला नाही. संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक व सहसंचालकांना दिल्या आहेत. त्यानुसार बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या बैठकांमध्ये अभ्यासक्रम बंद करण्यास संस्थाचालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
शासनाने सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सतत आवाज उठवत पत्रव्यवहारही केला आहे. त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने अनागोंदी कारभार उघड झाला आहे. शासनाने सर्वांच्या हितांचा विचार करुन निर्णय घ्यावा. धूळखात पडलेली प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाचे महासचिव विद्याधर गोडबोले व पुणे जिल्ह्याचे सचिव रमेश साळुंखे यांनी शासनाकडे केली आहे. शिष्टमंडळाने कौशल्यविकास व उद्योजकता विभागाचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले आहे.