नगर – आरोग्य सदृढ राहण्यासाठी मानवाला ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. ऑक्सिजन हा आपल्याला नैसर्गिकरित्या झाडापासून मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने दोन झाडे लावून आपले शरीर निरोगी ठेवावे, असे आवाहन अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेश वीर यांनी केले.
साईनगर परिसरात 100 झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. त्यावेळी डॉ. वीर बोलत होते. यावेळी डॉ. अखिलेश धानोरकर, डॉ. सुप्रिया वीर, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. सुदाम जरे, डॉ. रामदास बांगर, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, रवी शेलोत व साईनगरमधील नागरिक उपस्थित होते.
गणेश भोसले म्हणाले, वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्याचे काम गेल्या 20 वर्षांपासून करीत आहे. प्रत्येक वर्षी 100 झाडे लावून ते जगविण्याचे काम केले जाते. झाडे हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. झाडांमुळे आरोग्यबरोबरच त्या परिसराला सुंदरता प्राप्त होते. शासनाने वृक्षांची लागवड करीत असताना नागरिकांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. वृक्षारोपन काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून पार पाडल्याचे ते म्हणाले.
डॉ. दरेकर म्हणाले की, वृक्षलागवड ही फोटोसेशन पुरते मर्यादित न राहता वृक्षांचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.गणेश भोसले शहरामध्ये वृक्ष लावून ते जगवण्याचे काम जबाबदारीने करत असल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर एकत्र येऊन भोसले यांच्या प्रभागात वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.