नवी दिल्ली – दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे. दहशतवाद हे विभागासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानांवर कारवाईची गरज आहे, अशी परखड भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत मांडली. त्यातून भारताने पाकिस्तानवर निशाणा साधल्याचे सूचित झाले.
भारताने एससीओच्या व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन केले. त्यामध्ये बोलताना नायडू म्हणाले, दहशतवादाचा मुकाबला एकत्रितपणे करण्याची गरज आहे. धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचा फायदा उठवणारे देश चिंतेचा विषय आहेत. त्यांची कृती एससीओच्या जाहीरनाम्याविरोधातील आहे.
दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने आणि दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा आदींना आळा घालण्यासाठी एससीओने आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कायदेशीर पाऊले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले. एससीओसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर द्विपक्षीय मुद्दे मांडण्यावरून त्यांनी नामोल्लेख टाळून पाकिस्तानला फटकारले.
करोना संकट आणि त्याच्या प्रतिकूल परिणामांव मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. जागतिक लसीकरण कार्यक्रमांसाठी 60 टक्क्यांहून अधिक लस भारतात तयार केली जाते. जागतिक दर्जाच्या औषधनिर्मिती उद्योगामुळे करोना संकटकाळात भारत जगाची वैद्यकशाळा बनला आहे, असे नायडू यांनी अधोरेखित केले.