छत्रपती संभाजीनगर – येथील सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा रविवारी पार पडला. सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी चिठ्ठी काढत बछड्यांचे नामकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत चक्क ‘आदित्य’ हे नाव आले. हे नाव पाहताच मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दुसरी चिठ्ठी काढायला लावली. अखेर मुख्यमंत्र्यांनी (Cm Eknath shinde) दुसरी चिठ्ठी काढली व त्या बछड्याला “कान्हा’ असे नाव दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे बघड्यांच्या नामकरणावरून झालेल्या राजकारणाची चर्चा मात्र दिवसभर सुरु होती.
महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिताने 7 सप्टेंबर रोजी पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला. त्या पार्श्वभूमिवर सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्रामचा सोहळा रविवारी पार पडल्यानंतर या जन्मलेल्या या बछड्यांचा नामकरण सोहळाही पार पाडला. यावेळी लोकांनी पाठवलेल्या नावांची चिठ्ठी टाकून हे नामकरण करण्यात आले.
तिरस्काराने काही फरक पडत नाही – दानवे
या घटनेवर ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danave) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हे कोणताही आदित्य लपवू शकत नाही. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्याचे नाव कोणाला असेल किंवा नसेल फरक पडत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तरी फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी असाच तिरस्कार करावा. त्यामुळे, आदित्य अजून तळपेल.
जंगलामध्ये राहणाऱ्या वाघाच्या बछड्यांना नाव दिले जात नाही. असे नाव फक्त उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना दिले जातात. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत, हे देखील पाहिले पाहिजे.
– सुधीर मुनगुंटीवार, पर्यावरण मंत्री
वाघाच्या बच्छड्याला काय नाव द्यावे? हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राजकारण किती खालच्या पातळीवर गेले हे यातून तुम्हाला पाहायला मिळते. मी राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीवर फार बोलणार नाही. कारण आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा चांगला दिवस आहे.
– इम्तियाज जलील, खासदार