पुणे महापालिकेची निवडणूक लांबली आहे. या वर्षीच्या सुरवातीला होणारी ही निवडणूक न्यायालयीन, निवडणूक आयोगाच्या कामकाजात रेंगाळली आहे. कारण कुठलेही असले तरी ही निवडणूक साधारण वर्षभर पुढे ढकलली गेली हेच खरे.
आता, जानेवारी 2023मध्ये तरी पालिका निवडणूक होणार की नाही? याबाबतही विविध मुद्यांवर शंका व्यक्त केली जाते, अशी स्थिती असली तरी आता राजकीय पक्षांनी महापालिकेपेक्षा लोकसभेचीच तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे.
विशेषत: यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसते. भाजपने तर पुणे शहर आणि जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत अशा ठिकाणी भाजपने आताच रणनीती आखण्याचे काम सुरू केले आहे, अशा मतदारसंघांमध्ये भाजपकडून “लोकसभा प्रवास योजना’ राबविली जात आहे. यानुसार पुणे शहरासह जिल्ह्यातील शिरूर, बारामती आणि मावळ मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर, त्याला तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपले विधानसभा मतदार संघ भक्कम करण्यास सुरूवात केली आहे.
विशेष म्हणजे बारामती मतदार संघ अधिक भक्कम करण्याकरिता तयारी सुरू झालेली आहे. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची विशेष बैठक मुंबईतील “सिल्व्हर ओक’वर घेतली, यामुळे महापालिकेपेक्षा गेल्या महिनाभरापासून लोकसभेचीच चर्चा शहर-जिल्ह्यात ऐकू येत आहे.
पुण्यात “संधी’ कोणाला?
पुणे शहरातही गेल्या काही दिवसांत राजकीय उलाढाली झाल्या आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची बढती करीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आता प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. राज्यात कार्यरत राहताना 2024च्या निवडणुकीतही त्यांना “संधी’ दिली जाऊ शकते. यामुळे साहजकीच सध्याचे आमदार की खासदार? यांना पुन्हा “संधी’ मिळणार का? अशीही चर्चा आहे. त्यातच शहरात कॉंग्रेसच्या माजी खासदारांकडूनही “फेस्टिव्हल’चे आयोजन करीत पुन्हा चाचपणी केली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या “फेस्टिव्हल’मध्ये भाजपच्या नेत्यांची वर्णी अधिक होती. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात न झाली, तर नवलच!
शिरूर मतदारसंघ कोणाचा?
शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार विजय होणार, अशी जाहीर घोषणा भाजपचे नेते करीत आहेत. त्यामुळे शिरूर मतदारसंघावर भाजप दावा सांगणार की ही जागा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिंदे गटाला सोडली जाणार? हे नक्की नाही. शिवाय, आढळराव पाटील हे
भाजपचे उमेदवार असतील का? याबाबत चर्चा सुरू झालेली असताना केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी शिरूरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी होणार असे तालुक्यात झालेल्या जाहीर सभेत सांगून आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढविले आहे. त्यामुळे भविष्यात काय डाव-पेच आखले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संतोष गव्हाणे