प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसाच्या धारा… रस्त्यांवर खड्डे, वाहतूक कोंडी अन् त्यात नदीला आलेल्या पुराची भर यामुळे शुक्रवारी पुणेकरांची “पाऊस कोंडी’ झाली. रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असला तरी पालिकेची यंत्रणा सकाळपासून रस्त्यावर असल्याने पुणेकरांना कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला. पावसाने “कहर-ए-धार’चा पवित्रा घेत सकाळी शाळा, ऑफीस गाठण्याच्या वेळेतच पुणेकरांना गाठत त्रेधा उडविली.
गुरुवारी रात्रीपासूनच शहरात जोरदार पाऊस पडत होता. सकाळी आठच्या सुमारास पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्याने चाकरमान्या पुणेकरांनी घरातून बाहेर पडून कार्यालये, व्यवसायाच्या तसेच कामाच्या ठिकाणी निघण्याची तयारी केली. त्यामुळे, सकाळी आठच्या सुमारास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मुसळधार सुरू झाली. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची तारांबळ उडाली. त्यानंतर, जवळपास दोन ते अडीच तास शहराच्या सर्वच भागात पाऊस झाल्याने पावसातच पुणेकारांना इच्छित स्थळी पोहचावे लागले.
खड्ड्यांनी कोंडीत भर
पावसाने शहरातील रस्त्यांना काही मिनिटांतच तळ्याचे स्वरूप आले. भरीस भर म्हणून रस्त्यांवरील खड्डेही पाण्याने भरून गेल्याने वाहनचालकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावल्याने सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता स्वारगेटचा परिसर, दांडेकर पूल परिसर, मेंहदळे गॅरेज परिसर, डेक्कन परिसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच मुठा नदीत खडकवासला धरणातून 19 हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी सोडल्याने, तर पवना धरणातूनही मुळा नदीत पाणी सोडण्यात आल्याने बंडगार्डन येथे सुमारे 25 हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू होता. परिणामी खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग कमी असला तरी संगमाजवळ मोठ्या प्रमाणात मुळा-मुठाचे पाणी एकत्र आल्याने मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली.
चार दिवसानंतरही पुन्हा तीच अवस्था
रविवारी सायंकाळी शहरात अवघ्या तासाभराच्या पाण्याने शहराच्या बहुतांश भागात पूरस्थितीसदृश चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिकेकडून नेहमीच्या पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी सकाळीही रविवारी पाणी साचलेल्या अनेक भागांत पुन्हा पाण्याची तळी झाल्याचे पाहायला मिळाले.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाणी साचणाऱ्या तसेच पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय खडकवासला धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पूर येणाऱ्या भागातील नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. अशा ठिकाणी अग्निशमन दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली असून, शहरातील परिस्थितीवर सर्व विभाग लक्ष ठेवून आहेत.
– सचिन इथाप, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग