वर्धा – मागील अनेक दिवसांपासून करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे गरोदर महिलांना इतरांपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागली. या महामारीच्या काळात महिलांसाठी बाळांतपण आव्हानात्मक ठरलं आहे. यातूनही मार्ग काढत वर्ध्यातील एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर या महिलेचा करुण अंत झाला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ही घडना घडली.
नऊ महिने बाळाला पोटात वाढवलं. प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रोहिणी उर्फ गौरी अभिजीत डवले (28) या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या गोंडस मुलीचं दुर्दैव हेच की, तिला तिच्या आईचा चेहराही पाहायला मिळाला नाही. डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळांतीनीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
रोहिणी यांना बुधवारी राणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बालरोग तज्ज्ञ कालिंदी राणे यांनी शुक्रवारी दुपारी तपासून त्यांचं सिझेरियन केलं होतं. मुलगी जन्माला आल्याने आनंदाचं वातावरण होतं.
दरम्यान रोहिणी यांच्या पोटात अचानक दुखणे सुरू झालं. तसेच त्यांना उलट्याही झाल्या. डॉ. कालिंदी राणे यांना याची माहिती देण्यात आली. मात्र असं होतच असतं, असं सांगून डॉ. राणे यांनी नर्सच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं.
दोन तासांनी रोहिणी यांचा त्रास अधितच वाढला. अखेरीस डॉ. राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कोल्हे, डॉ. कदव व भूलतज्ज्ञ डॉक्टरांना देखील बोलावलं. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही अन् रोहिणी यांनी अखेरचा श्वास घेतला. यावर रोहिणी यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर आरोप केला.डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे आणि सिझेरियन करताना झालेल्या चुकीमुळे रोहिणी यांचा जीव गेल्याचा आरोप केला. तसेच पोलिसांत तक्रार केली आहे.