नवी दिल्ली – भारतामध्ये वाहन उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. आता भारतातील हा उद्योग जगातील चौथ्या क्रमांकाचा आहे. त्यामुळे वाहनांचे वितरण करणाऱ्या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज असल्याची मागणी या क्षेत्रातील संघटनेने केली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेच्या परिषदेमध्ये याविषयी मागणी करण्यात आली. जर वाहन वितरण क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला तर त्यामुळे बॅंका या क्षेत्राला सढळ हाताने कर्जपुरवठा करू शकतील. त्याचबरोबर वाहन उद्योगाला देशातून आणि परदेशातून भांडवल उभा करणे सोपे जाईल. या क्षेत्राला भांडवल उपलब्ध झाल्यानंतर हा उद्योग आणखी विकसित होईल.
कारण आगामी काळात भारतामध्ये वाहन क्षेत्रामध्ये आणखी क्रांतीकारक बदल होणार आहेत. या अनुषंगाने असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, वाहन वितरण क्षेत्रात 45 लाख लोक काम करतात. या क्षेत्रातून सरकारला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 95 हजार कोटी रुपयांचा कर भरणा केला जातो. या उद्योगाला अधिक भांडवल लागते. त्यामुळे वितरकांना भांडवल उभा करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर ओढाताण करावी लागते. जर या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला तर वितरकांना यासाठी बॅंकाकडून आणि इतर वित्तीय संस्थांकडून सहज कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.
परंपरागत पद्धतीने हा उद्योग उभारण्याऐवजी आधुनिक पद्धतीने हा उद्योग उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहन उत्पादकांनी सरकारकडे यासाठी आग्रह धरावा असे त्यांनी सूचित केले. भारतामध्ये दरडोई वाहनांची संख्या अजूनही बरीच कमी आहे. आता विकास दर वाढणार आहे. त्याचबरोबर नागरिकाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये वाहनांची विक्री वाढणार आहे.
त्याकरिता वितरकांचे जाळे अधिक मजबूत करण्याची गरज आहे. मात्र यासाठी भांडवल लागते. जर या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिला तर वितरकांचे अनेक प्रश्न सुटू शकतील. त्याचबरोबर ज्या भागात वितरक नाहीत त्या भागांमध्ये वितरक निर्माण होण्यासाठी मदत होईल. वितरक नसलेल्या भागामधील नागरिकांना वाहनांची खरेदी आणि देखभाल करताना जास्त त्रास होतो. त्यामुळे ती वाहने घेण्याचे टाळतात.