नवी दिल्ली : अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. एवढंच नव्हे तर आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, अशा आशयाचे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. या पत्रावर ४० आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांच्या या कृत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या कृत्यावर जितेंद्र आव्हाडांनी टीकास्र सोडत,” मला त्यांची (अजित पवार) मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे. आपण जी राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणतो, ती महाराष्ट्राला सांगायची आहे. त्या काकाला (शरद पवार) पूर्णपणे गिळून टाकायचं आहे, ही राक्षसी महत्त्वकांक्षा त्यांनी स्वत: महाराष्ट्रापुढे उघड केली आहे.
पुढे जितेंद्र आव्हाड यांनी,“तुम्ही किती तारखेला निवडणूक आयोगाकडे गेले होते? आणि किती तारखेला जाहीर केलं? तुम्ही १ किंवा २ जुलैला निवडणूक आयोगाकडे जाता आणि ५ जुलैला हे जाहीर करता. तोपर्यंत सगळं लपवून ठेवता. तुम्ही कायद्याच्या सगळ्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जात आहात.” असा खडा सवाल यावेळी त्यांनी केला.
त्यासोबतच “मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, ज्या शरद पवारांनी हा वटवृक्ष निर्माण केला. त्यालाच घरट्यातूनच बाहेर काढायचं. शरद पवारांनी तुमची कोणतीच महत्त्वाकांक्षा कधीच रोखली नाही. १९९० पासून मी सगळ्यांना बघितलं आहे,” असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.