मुंबईस्थित कराड दक्षिणकर मेळाव्याला प्रतिसाद
कराड – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जे माथाडी कामगारांचे नेते एकमेकांच्या विरोधात होते. ते सर्व कराड दक्षिणचे भाजपाचे उमेदवार ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विजयासाठी एकत्र आल्याचे चित्र रविवारी मुंबईत अतुलबाबांच्या प्रचारार्थ आयोजीत मुंबईस्थित कराड दक्षिणकर नागरिकांच्या स्नेहमेळाव्यात दिसून आले. मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या कराड दक्षिणमधील मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ना. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, ना. नरेंद्र पाटील, माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस बळवंतराव पवार, माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील, दिपक रामिष्टे, सातारा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष संजय बाबुराव शेटे, नवी मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष संपतराव शेवाळे, नगरसेविका दमयंती आचरे, भारती पाटील, ओंकार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश ताटे, उद्योजक प्रदीप साळुंखे, चंद्रकांत शेवाळे, राजाराम पाटील, किसन जाधव, अशोक भावके, चंद्रकांत पाटील, पांडुरंग शेटे, एकनाथ तांबवेकर, शंभू गावडे, विलासराव पाटील, अमित शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान अण्णासाहेबांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सर्व प्रमुख माथाडी कामगार नेत्यांचे मला भक्कम पाठबळ लाभल्याने माझा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये रस्ते, पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लागलेली आहेत.
विकासाची घौडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन त्यांनी केले. ना. नरेंद्र पाटील म्हणाले, जी मंडळी गेल्या निवडणुकीवेळी पलिकडच्या बाजूला होती, ती आज अतुलबाबांच्या बाजूला असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. अतुलबाबांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी आहे. त्यामुळे अतुलबाबांनी गेल्या 5 वर्षात करड दक्षिणेत भरघोस निधी आणला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आता अतुलबाबांनी आणलेल्या कामांचे नारळ फोडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली. माजी खासदार संजीव नाईक म्हणाले, आज महाराष्ट्रात सर्वत्र कमळ फुलले आहे.
अतुलबाबांना साक्षात विठुमाऊलीचा आशीर्वाद असल्याने त्यांचा विधानसभेत विजय पक्का आहे.
यावेळी माथाडी कामगारांचे नेते बळवंतराव पवार, पोपटशेठ पाटील, संपतराव शेवाळे व संजय बाबुराव शेटे, विलासराव पाटील, अमित शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय शेवाळे यांनी स्वागत केले. संजय शेटे यांनी प्रास्तविक केले. पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कराड दक्षिणचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.