दुबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) भारत व अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. साखळीतून सुपर फोर गटात थाटात प्रवेश केलेल्या भारताला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले असले तरीही चमत्कारावर विश्वास असलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा तरी राखता येणार का हेच पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.
Hello from Dubai International Stadium for the #INDvAFG clash 👋#TeamIndia #AsiaCup2022 pic.twitter.com/PUKBZtIgNt
— BCCI (@BCCI) September 8, 2022
साखळी फेरीतील पाकिस्तान व हॉंगकॉंगविरुद्धचे सामने सहज जिंकत भारतीय संघाने सुपर फोर गटात प्रवेश केला. या गटातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर श्रीलंका संघानेही भारतीय संघावर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा दावा भक्कम केला.
द्रविड-रोहित युती अपयशी
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांची युती या स्पर्धेत अपयशी ठरली आहे. अंतिम संघ निवड, अपयशी ठरत असलेल्या लोकेश राहुल व ऋषभ पंतचे स्थान कायम राखणे तसेच गोलंदाजीतील बदलांबाबतचे निर्णय, क्षेत्ररक्षण व भुवनेश्वर कुमारवर अतिविश्वास हेच मुद्दे भारतीय संघाच्या सलग दोन पराभवांचे कारण ठरले आहेत. त्यामुळे आता ही जोडी यशाच्या मार्गावर कधी येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता या गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना अफगाणिस्तानशी खेळणार आहे. स्पर्धेतील अन्य तीन संघ कशी कामगिरी करतात यावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळेल का याची चर्चा सध्या सुरु असली तरीही अंतिम फेरीतील स्थान मिळवण्याची भारतीय संघाची संधी जवळपास संपुष्टात आली आहे.
या स्पर्धेनंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांशी टी-20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकत प्रतिष्ठा राखून मायदेशी परतण्याची ही अखेरची संधी आहे.