बीसीसीआयची सर्वसाधारण सभा
अहमदाबाद – आयसीसीच्या जागतिक स्पर्धांचे आयोजन मिळवण्यासाठी आता थेट केंद्र सरकारशी करसवलतीबाबत चर्चा करण्यात येणार असून त्यावरून आता चांगलाच सामना रंगणार आहे. भारतात क्रीडा क्षेत्रातील स्पर्धांसाठी कोणतीही करसवलत दिली जात नाही, त्यामुळे आता बीसीसीआयच्या केंद्राशी होणाऱ्या चर्चेचे फलित काय होणार हे येणारा काळच ठरवेल. या व्यतिरिक्त बीसीसीआयच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पुढील वर्षीची आयपीएल स्पर्धा जरी आठच संघात होणार असली तरीही त्यानंतरच्या 2022 सालच्या स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होतील. तसेच करोनामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रथम दर्जाच्या क्रिकेटपटूंना (महिला व पुरुष) वाया गेलेल्या जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीतील संपूर्ण मानधन तसेच करारातील रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
2022 सालच्या आयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 2022 च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. बीसीसीआयच्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रथम श्रेणीच्या सर्व महिला व पुरुष क्रिकेटपटूंना करोनाच्या धोक्यामुळे स्पर्धा न झाल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यांनाही योग्य तो मोबदला देण्यावर एकमत झाले. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण असल्याने 2021 सालची आयपीएल स्पर्धा आठच संघात खेळवली जाणार आहे.
आयसीसीच्या जागतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी करसवलत मिळावी यासाठी आयसीसीने दिलेल्या मुदतीला एकच आठवडा उरला असल्याने बीसीसीआयचे सचिव जय शहा व खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 विवकरंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला राखायचे असेल तर पूर्ण करसवलतीची खात्री आयसीसीला द्यावी लागणार आहे अन्यथा ही स्पर्धाही यंदाच्या आयपीएलसारखी अमिरातीमध्ये आयोजित होईल. देशातील सध्याच्या कायद्यानुसार क्रीडा स्पर्धाना करसवलत मिळत नाही. यावरच बीसीसीआय सचिव आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करतील. त्याचबरोबर प्रसारणकर्ते प्रत्येक वर्षी 60 सामन्यांसाठी पैसे मोजत असतात. स्टार इंडियाने 2018-2022 या कालावधीसाठी प्रत्येक 60 सामन्यांच्या मोसमाकरिता 16 हजार 347 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढली तर, त्यांच्याशी नव्या कराराबद्दल बोलणी केली जाणार आहेत.
निष्ठावंताचे संस्थान खालसा
सरव्यवस्थापक व जुनेजाणते संघटक के. व्ही. पी. राव यांना सर्वसाधारण सभेत थेट राजीनामा देण्यास सांगितले गेले. ही सभा वादळी होणार याची कुणकुण यापूर्वीच लागली होती. अपेक्षेप्रमाणे या सभेत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राव हे गेल्या जवळपास दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ बीसीसीआयमध्ये या पदावर कार्यरत होते. त्यांनी जरी बीसीसीआयचे आजवर दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले असले तरीही निष्ठावंतांनाच डच्चू दिले जात असल्याचा संदेश या कृतीतून देण्यात आला आहे. राव यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या ई-मेलमध्ये सर्वांप्रती आभार व्यक्त केले आहेत.
ऑलिम्पिक समावेशासाठी प्रयत्न
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, त्याला आजवर यश आलेले नाही. यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 साली लॉस एंजलिसमध्ये होत असलेल्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश असावा असे मत व्यक्त करताना आयसीसीशी बोलणीही केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरीही आता आयसीसीला मदत करण्यासाठी व पूर्ण सदस्य असलेल्या देशांशी याबाबत बोलणी करण्यासाठी बीसीसीआयने तयारी केली आहे. या स्पर्धेत टी-20 क्रिकेट असावे असे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.