नगर – गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी झाल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा जास्त घट आल्याने शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर ठेवलेला मका सध्या मातीमोल भावात विकावा लागत असून, शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या या पिवळ्या सोन्याची तेजी दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून, हातात आहे ते उत्पन्न विकण्यासाठी त्याची धावपळ असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
अडीच हजारावर पोहोचलेले मक्याचे दर गेल्या काही दिवसांपासून बाराशे, तेराशे, चौदाशे रुपये क्विंटल दराच्या आतच असून, पुढील काळात दर अजून कमी होतील, अशी भीती व्यापारीवर्ग शेतकऱ्यांना दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याने शेतकरीवर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.
यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात उन्हाळी मक्याची लागवड केली आहे. येत्या काही दिवसात उन्हाळ मकाही काढणीस येणार असल्याने दर वाढण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी आहे तो मका मिळेल त्या भावात विक्री करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
कर्ज कसे फेडायचे?
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांना मातीमोल दर मिळत असल्याने केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.वातावरणातील बदलामुळे पिकांचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बॅंका वा पतसंस्थांकडे गहाण ठेवून भांडवल घेतले आहे; मात्र शेतीसाठी भांडवल म्हणून उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.