संगमनेर (प्रतिनिधी) – शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगावपागा व निमगाव खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरासमोर, ओढ्या लगतच्या स्मशान घाट परिसरामध्ये किरकोळ भाजीपाला विक्री व्यवसाय गेल्या एक महिन्यापासून नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे. नागरिकांचाही या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण जगामध्ये करोना व्हायरसने हाहाकार केला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून संपूर्ण राज्यातील नागरिक हे आप-आपल्या घरांमध्ये लॉकडाऊन आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना तीन तास संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.
संचारबंदी शिथिल काळामध्ये नागरिकांना सोशल डिस्टन्सचा उपयोग करून भाजीपाला, औषधे, किराणा, दूध, फळे इत्यादी वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील गावांमध्ये नागरिकांनी गर्दी न करता अत्यावश्यक असलेला भाजीपाला घेता यावा, यासाठी निमगावपागा व निमगाव खुर्द या येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कामगार पोलीस पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावांमध्ये गर्दी न करता गावाच्या कडेला असलेल्या निसर्गरम्य स्मशानभूमी परिसरामध्ये भाजीबाजार सुरू केला आहे. त्याला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामीण भागात देखील नागरिकांची वर्दळ नसल्याने जंगलातील पशुपक्षी, प्राणी हे मुक्त संचार करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून निमगाव पागा व निमगाव खुर्द स्मशानभूमी परिसरात भाजीपाला फळे व्यवसाय सुरू झाल्याने या परिसरामध्ये चार माकडांनी आपला मुक्काम दीड महिन्यांपासून याठिकाणी केला आहे. येथील फळविक्रेते या मुक्या प्राण्यांसाठी काकडी, द्राक्ष, टरबूज इत्यादी फळे देऊन या मुक्या प्राण्यांची उपास मार थांबवली आहे.