वाघोली,(प्रतिनिधी)- कोपर्डी येथील घटनेनंतर आरोपींवर झालेल्या हल्ला प्रकरणात तुरुंगात वारी भोगलेल्या तिघांनी आम्हाला काहीच मिळाले नसल्याचे सांगत मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले. या आरोपानंतर वाघोलीतील मराठा बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करून आरोप केलेल्यांना जामिनासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मदत केल्याचे सांगितले.
याबाबतचे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. मुंबईला जात असताना वाघोलीत जरांगे व मराठा बांधवांच्या जेवणाची, वास्तव्याचे नियोजन करण्यासाठी आलेला खर्च कोणत्याही पक्षाने नाही तर वाघोली, खराडी, लोहगाव, वडगावशेरी तसेच परिसरातल्या गावातील मराठा बांधवांनी केला असल्याचे मराठा बांधवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक झाले असतानाच त्यांच्यावर सहकार्यांकडून गंभीर केले जात आहे. कोपर्डी प्रकरणी आरोपींवर हल्ला केलेल्या तिघांनी आम्हाला काहीच मिळालेलं नसल्याचे सांगत अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांचे वाघोलीतील मराठा बांधवांनी खंडन केले असून, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर स्वागत केले.
हल्ला करणार्यांना वाघोलीतून 51 हजारांची मदत झाली तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रेशन पुरविण्याचे काम झाले असल्याचे फोटो पुरावे पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. त्याचबरोबर आरोप करणारे व राणे पुत्रांचे संबंध कसे आहेत, याचे फोटो दाखविण्यात आले. मनोज जरांगेच्या भूमिकेला वाघोलीतील मराठा बांधवांनी पाठींबा असणार असल्याचे सांगितले.
ठराविक पक्षाने जरांगे यांना निधी पुरविला असल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबईला जात असताना पुण्यात वाघोली येथील मुक्काम व जेवणाची तयारी करण्यासाठी लागणारा खर्च हा कोणत्याही पक्षाने नाही तर वाघोली, खराडी, लोहगाव, वडगावशेरी तसेच परिसरातल्या गावातील मराठा बांधवांनी केला असून एक अन एक पैशाचा हिशोब असल्याचे उपस्थित मराठा बांधवांनी सांगितले.