सेंच्युरीयन – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून प्रचंड टीका सुरू झाली आहे.
पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही तो यष्टीबाहेरच्या चेंडूला बॅट लावून यष्टीमागे झेल देत बाद झाला. पहिल्या डावात त्याला 35 धावांवर लुंगी एन्जीडीने तर, दुसऱ्या डावात मार्को जेन्सनने 18 धावांवर बाद केले.
2018 सालापासून कोहली याच पद्धतीने यष्टीबाहेरच्या चेंडूवर बाद होत आहे. जितके कसोटी सामने त्याने या कालावधीत खेळले त्यात तब्बल 80 टक्केवेळा तो या पद्धतीने अत्यंत बेजबाबदार फटका मारून परतला आहे.
शार्दुलबाबत पंचांची चूक
शार्दुल ठाकूर याला बाद देताना मैदानावरीलच नव्हे तर तिसऱ्या पंचाकडूनही चूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर वेन मल्डरने शार्दुलचा झेल घेतला व पंचांनी त्याला बाद घोषित केले.
आयसीसीच्या नव्या नियमानुसार गोलंदाजाने टाकलेला चेंडू योग्य आहे का, तसेच हा चेंडू नोबॉल आहे का हे पाहण्याचे काम मैदानावरील पंचांसह तिसऱ्या पंचाचेही आहे. रबाडाने टाकलेला हा चेंडू चक्क नोबॉल होता तरीही शार्दुलला बाद दिले गेले त्यामुळे आता पंचांच्या कामगिरीवरही टीका होत आहे.