नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी बिहारच्या निवडणूक प्रचाराला आज एका व्हर्चुअल जाहीरसभेद्वारे सुरूवात केली. त्यासाठी बिहार मध्ये हजारो ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.
या सभेत त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाची वाखाणणी करीत बिहार मध्येही नितीाकुमारांच्या सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केले. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय प्रचार सभा घेतल्याबद्दल त्यांच्या या सभेवर जोरदार राजकीय टिका सुरू झाली.
त्यानंतर मात्र त्यांनी लगेच सारवासारवी सुरू केली असून आपली ही सभा लोकांचे करोना लढ्यातील नितीधैर्य वाढवण्याच्या प्रकाराचाच एक भाग होता असे त्यांनी म्हटले आहे.
बिहार मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बिहारी जनतेशी संवाद साधण्यासाठी अमित शहा यांनी ही जनसंवाद रॅली केली आज केली. तथापि त्यांच्या वर चौफेर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी करोना योध्यांना अभिवादन करण्यासाठी आणि लोकांमधील नितीधैर्य वाढवण्यासाठीच या सभेचे आयोजन करण्यात आल्याचा पवित्रा घेतला. अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यास विरोधकांना कोणी रोखले होत असा सवालही त्यांनी केला आहे.
अमित शहा यांनी या सभेत मोदींनी गेल्या सहा वर्षाच्या काळात देशासाठी कायकाय केले याची यादी सादर केली. त्यात त्यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेला एअर स्ट्राईक, सीएए कायदा, ट्रिपल तलाक रद्द करण्याचा निर्णय, राम मंदिराच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांना आलेले यश, काश्मीरचे कलम 370 रद्द करणे अशा मुद्द्यांचा उल्लेख करत मोदी सरकारने भरीव काम केल्याचा दावा केला होता. बिहारच्या निवडणुकीत एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी या प्रचार सभेत केला होता.
अमित शहांच्या या सभेचा राजदच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र थाळ्या वाजूवून निषेध केला आणि त्यांनी या रॅलीची खिल्लीही उडवली. त्याचा संदर्भ देत अमित शहा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी करोना योध्यांचा सन्मान करण्यासाठी लोकांना थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते त्यांचे हे आवाहन शेवटी विरोधी पक्षांनी मान्य केले ही आनंदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.