महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रकार; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमुळे मुलांची सुखरूप सुटका
सांगली (प्रतिनिधी) -कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून करण्यात येत असलेल्या सांगलीतील तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमुळे फसला. याप्रकरणी रमेश झडे (मूळ गाव बलवडी ता. खानापूर जि. सांगली, सध्या रा. मुंबई) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीतील हनुमाननगर येथील तीन अल्पवयीन मुले खेळताखेळता बुधवारी रात्री सांगली रेल्वे स्थानकावर पोहचली. रेल्वे स्थानक परिसरात तिन्ही मुले खेळत होती. यावेळी सांगली रेल्वे स्थानकात थांबलेला संशयित रमेश झेंडे याने या मुलांची विचारपूस करण्यास सुरुवात केली.
मुलांच्या आजूबाजूला त्यांचे कोणी नातेवाईक नसल्याचे हेरून संशयिताने त्यांना “मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे, तुमचे पप्पा पुण्यात काम करीत आहेत, चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो,’ असे सांगितले. दरम्यान, दुपारी खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने मुलांच्या घरात एकच खळबळ उडाली होती.
नातेवाईकांकडून सर्वत्र शोधाशोध करण्यात येत होती. मुले बेपत्ता झाल्याबाबत तत्काळ विश्रामबाग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मुलांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. यावेळी बुधवारी रात्री कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्थानकात आली. संशयित तिन्ही मुलांना घेऊन रेल्वेने निघाला होता. त्याने तिन्ही मुलांना एका बोगीत खाली बसवले होते.
महालक्ष्मी एक्स्प्रेसने सांगली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर ताकारी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली. सांगली ते सातारा रेल्वे स्थानकादरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसला कडेकोट बंदोबस्त देण्यात येतो. यामुळे बोगीच्या खिडक्या बंद करण्याचे आवाहन करीत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या बोगीत पोहोचले. त्यांना तीन मुले संशयास्पदरित्या बसल्याचे त्यांना आढळून आले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या मुलांकडे चौकशी केली असता मुलांनी त्यांना घडला प्रकार सांगितला. यावेळी संशयित बाथरूमध्ये गेला होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आल्याने त्यांनी बाथरुममध्ये गेलेला संशयित बाहेर येताच त्याला ताब्यात घेतले. याबाबत सातारा रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले.
महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा रेल्वे स्थानकात मध्यरात्री पोहोचताच सातारा रेल्वे पोलिसांनी तीन अल्पवयीन मुले व संशयिताला ताब्यात घेतले. जवानांच्या सतर्कतमुळे अपहरण झालेल्या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. दरम्यान, सांगलीत तपास करीत असलेल्या विश्रामबाग पोलीसांच्या पथकास सांगलीतून तीन मुलांचे अपहरण करून महालक्ष्मी एक्सप्रेसने नेण्यात आल्याचे समजले. सातारा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी ताब्यात घेतलेली तीन अल्पवयीन मुले व संशयित झेंडे यास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.