विशाल भालेराव
खडकवासला – सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे गावागावांमध्ये मोर्चेबांधणीला उधाण आले आहे. ओळखीच्या, नात्यातील लोकांना भेटण्याची लगबग इच्छुकांकडून सुरू झाली आहे, असे असले तरी जनता प्रस्थापितांना नाकारत नव्यांना संधी देणार का? हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
जिल्ह्यात बहुसंख्य पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत आहे. भाजपला हुलकावणी देत राज्याची सत्ता महाआघाडीकडे असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात उत्साह आहे.
महाआघाडीतील घटक पक्षांनी निवडणुका स्वतंत्र लढवल्या तरी सत्ता स्थापन करताना भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी होऊ शकते. असे असले तरी भाजप महाविकास आघाडीला कशी टक्कर देणार याबाबत गावागावांत चर्चेला उधाण आले आहे.
निवडणूक महाविकास आघाडी करुन लढणे गरजेचे आहे. परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आमची सत्ता असल्याने आम्ही श्रेष्ठ आहोत असे म्हणत आहेत. परंतु या दोन वर्षातील कार्यकाळात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढलेली आहे. त्यामुळे आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे.
– रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख शिवसेना
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे शक्य असेल तिथे महाविकास आघाडी केली जाईल. तर काही ठिकाणी स्वतंत्रही निवडणुक लढवावी लागेल. कारण राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे. निवडणुकीनंतर पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडी करायची का नाही ठरेल.
-लहू निवंगुणे, अध्यक्ष बारामती लोकसभा कॉंग्रेस