गाणं कुणाला आवडत नाही? मानवी भावभावनांचा आविष्कार म्हणजे गाणं! थोड्या शब्दात मांडलेल्या खूप साऱ्या भावना म्हणजे गाणं! आनंदात, सुखदुःखात, उदासीत, एकटेपणात गाण्याच्या छटा रंग बदलत राहतात, खूप काही थोड्या शब्दात व्यक्त करणं म्हणजे गाणं! रामायण, महाभारत ही महाकाव्यच. सृष्टीतही गाणे भरून आहेच ना? पक्षीही मूडनुसार गातात, आनंदाची लकेर वेगळी, दुःखाची वेगळी, साथीदाराला साद घालण्याची वेगळी, निर्झर एकांतात खळखळतात अन् त्या खळखळण्यातून जन्मते गाणं, वाऱ्याच्या वाहण्यातून वेळूच्या बेटी शीळ घुमते अन् गाणं तयार होतं. जीवनातून, निसर्गातून गाणं वजा केलं तर सृष्टी अन् जीवन दोन्ही निरस होईल! गाण्याचा जनक कोण असेल त्याने मानवी जीवन अन् सृष्टी रंगीत सुरेल करून टाकलीय.
हिंदी, मराठी चित्रपटाने तर असंख्य अवीट, मधूर गाणी दिलीत ती कोणत्याही काळात प्रेरक आहेत, काही आनंद देणारी तर कधी आपल्याच जीवनाचा अर्थ सांगणारी, आपल्या जीवनाची कहाणी सांगणारी! राही मनवा…, गर्दीश मै है तारे…, रूक जाना नही कही तुम हारके… यासारखी नैराश्य पळवून लावणारी… गीत गाता चल म्हुणून सदा आनंदी ठेवणारी… ही दुनिया हाय एक जत्रा म्हणून माणसाचे स्वभाव वाचणारी किती गाणी मोजदाद नाही करता येणार. या गाण्यांनी प्रत्येक पिढीच्या जीवनात प्रवेश केलाय. काळाशी सुसंगत लिहिली असली तरी काळाच्या ओघात वाहून नाहीत गेली हे विशेष! ती अजूनही आपले जीवन व्यापून राहिली त! आता हे गाणं पाहा-
जिंदगी का सफर… है ये कैसा सफर
कोई समझा नही कोई जाना नही…
खरेच जीवन जन्मापासून सुरू होते अन् मृत्यूत संपते. या दोन ठिकाणामध्ये आपण जीवन प्रवास करतो, काय करतो नेमकं? प्रवास म्हणजे? चालत राहतो? होय जन्माकडून मृत्यूकडे! यात मग असंख्य प्रवासी, प्रसंग, सावली, ऊन्ह सगळं सगळं अनुभवायला, येते कुणी वाटाड्या होते, कुणी साथी तर कुणी दुष्मन! वेगवेगळ्या भूमिकेतले, वेगवेगळ्या मुखवट्यातले लोक आपापल्या भूमिका आपल्या जीवनात वठवतात अन् निघून जातात. आपण चालत राहतो त्या रस्त्यावर अखंड अनेक चढ उतार पार करत पण कुठे चाललोय? का चाललोय? हे मात्र नसते कळत! ज्याला कळते तो स्थितप्रज्ञ होतो, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकतो अन् जीवनप्रवास यशस्वी आनंदी पणे पार पाडतो. बऱ्याच वेळा अशी माणसे मग त्या वाटेवरून चालताना आलेले काटेकुटे दूर करतात. मागून येणाऱ्या पांथस्ताचा जीवनप्रवास सुखी होण्यासाठी हिरवळ ठेवून जातात.
जीवनाचा हा प्रवास रडत सुरू होतो अन् मृत्यूकडे जातानाही कधी रडत खडत तर कधी हसत जातो, जीवनाचा अर्थ समजलेली माणसे मृत्यूला हसत हसत कवटाळतात, जातात हसत त्याच्याबरोबर, पण कुठे? न उलगडलेले कोडे. खरेच का पुनर्जन्म असतो? की देहासारखा आत्माही या सृष्टीत विलीन होतो? का तोही सूक्ष्म कण होऊन ब्रह्मांडात विलीन होतो? असे म्हणतात पापपुण्यानुसार पुढील जन्म मिळतो मग असे युगेयुगे चालतच राहातो की तुटते हे ही चालणे? शोध लागला नाही पण तरीही आपण जगत राहतो, चालत राहतो अव्याहत जन्माकडून मृत्यूकडे! कितीतरी जीवन न जगताच संपतात, म्हणजे जीवनाचा आनंद न घेताच निघून जातात खरेच का मग हे जीवन जगले? या दुनियेतल्या असंख्य जीवजंतू प्रमाणे ते आले अन् गेले. त्यांच्या अस्तित्वाची दखलही नसते.
बऱ्याचदा चालताना जगायचे राहते अन् मृत्यूचे बोलावणे येते! निमूटपणे जातो हुरहूर ठेवून इतक्या दिवसात ‘मी जगलो नाही फक्त चाललोच!’ बऱ्याचदा अल्पायुषी होऊन निघून जावे लागते त्यांना तर काहीच अनुभवता येत नाही! काही फुले उमलतात, काही अर्धवट उमलतात तर काही कळ्यातच मरून जातात. काळ थांबत नाही, प्रवासही थांबत नाही जन्माकडून मृत्यूकडे अन् मृत्यूकडून जन्माकडे पण या प्रवासात आनंदाचे चार क्षण जो सोबतीला घेतो त्याचा प्रवास आनंदी होतो, जो आपल्याबरोबरचे हे क्षण दुसऱ्यालाही देतो तो जीवन बाग फुलवतो अन् जो स्वतः काट्याकुट्यात चालत दुसऱ्यांच्या जीवन प्रवासात हिरवळ निर्माण करतो तो देवदूत ठरतो नाही का? जीवन का सफर कोई समझा नही कोई जाना नही… खरेच!
सुचित्रा पवार