काश्मिरी कशिदाकारी ही माणसाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला थंडी, वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि नंतर लज्जारक्षणासाठी माणसानं वेगवेगळ्या प्रकारचं कापड निर्माण केलं यात काहीच नवल नाही. पण माणसानं त्यावर भरतकाम करून आपली कला प्रकट केली तो क्षण खरा सर्जनाचा म्हणावा लागेल. तिथेच खरं म्हणजे माणूस आणि प्राण्यांमधला फरक स्पष्ट होतो. जो फक्त गरज भागवतो तो प्राणी आणि जो त्याही पलिकडे जाऊन त्यातून कला निर्माण करतो तो माणूस.
भरतकाम कसं निर्माण झालं असेल हे पाहायला गेलं तर ही कला सगळी कामं संपल्यावर दुपारच्या वेळी बायकांनी फाटलेले कपडे शिवताना ते फाटल्यामुळे तिथे शिवावं लागलं आहे हे लपवण्यासाठी कलाकुसर केली असल्याचं कळलं आणि बायकांच्या कोंड्याचा मांडा करायच्या वृत्तीला सलाम करावासा वाटला. काही प्रकारचे भरतकाम तर आधीच्या जुन्या कापडांचे धागे काढून ते नव्या कपड्यांवर नक्षी तयार करून सजवायला वापरायचे! प्रत्येक प्रकारच्या भरतकामाची आपली स्वत:ची एक ओळख आहे; तसंच प्रत्येक हाताने भरतकाम केलेला कापडाचा तुकडा आपली स्वत:ची एक गोष्ट मिरवत असतो हे नक्की. आपल्या भारतात प्रत्येक प्रांतानुसार भरतकामाची वेगळी शैली आहे हे पाहीलं की खूप आश्चर्य वाटतं.
आपल्याकडचा कदाचित सर्वात जुना म्हणता येईल असा भरतकामाचा प्रकार म्हणजे जम्मू काश्मीरची कशिदाकारी. काश्मीर खरंतर राजकीयदृष्ट्या कायमच असुरक्षित आणि मुघल, अफगाणिस्तान, शिख आणि डोगरा अशा वेगवेगळ्या सत्तांतरांच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. पण गंमत म्हणजे या राजकीय सत्तांनी काश्मिरी कशिदाकारीला कायम प्रोत्साहनच दिलं.
कशिदाकारी ही वेगवेगळ्या रंगाच्या सुती, रेशमी किंवा लोकरीच्या दोऱ्यांनी कापडावर विणकाम करण्याची कला पंधराव्या शतकात श्रीनगरमध्ये उगम पावली. त्या काळी श्रीनगर हे लहानसं गाव होतं. तेव्हा सुलतान झईन उल अबिदिन या मुघल राज्यकर्त्यानं श्रीनगरच्या जवळपासच्या सगळ्या विणकर कलाकारांना श्रीनगरमध्ये वसवलं आणि शाल आणि इतर प्रकारची कापडं तयार करण्याच्या कलांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला. त्यानं या शालींची गुणवत्ता ठरवण्याचे निकष निर्माण केले, त्यात वापरल्या जाणाऱ्या दोऱ्यांना रंग देण्याच्या पद्धती ठरवल्या आणि मुख्य म्हणजे त्या प्रमाणित केल्या. त्यानं त्या भागाच्या आजूबाजूची शाली विणण्याची अनेक तंत्रं आणि प्रकार एका ठिकाणी केंद्रित केली. हीच तंत्रं आजही वापरात आहेत हे विशेष!
त्यानंतर आलेल्या मुघलांसहित प्रत्येक राज्यकर्त्यानं ही तंत्रं अजूनच विकसित केली, या शालींच्या आणि विणलेल्या कापडाची जास्तीत जास्त जाहिरात केली. सतराव्या शतकात या शाली फक्त भारतातच नाही तर अतिपूर्वेच्या देशांसहित पाश्चिमात्य देशांतही लोकप्रिय झाल्या होत्या. मुघलांनंतर आलेल्या अफगाणांनी चौरसाकृती आणि अर्धचंद्राकृती शाली निर्माण केल्या. त्यात अनेक नवीन रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी आणल्या. त्यानंतरच्या शिखांनी या शाली अंगावर घेण्याचे वेगवेगळे प्रकार निर्माण केले. आणि शेवटी आलेल्या डोगरांनी त्यावर विणण्याच्या नक्षीमध्ये खूपच प्रगती केली. त्यांनी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे रंग आणि भरतकाम केलेल्या दोन्ही बाजू सुलट्या पद्धतींनी वापरता येतील अशी दो-रुखा शाल निर्माण केली. ही काश्मिरी कशिदाकारी केलेली शाल कायमच अनेक राजे-महाराजांसहित सगळ्यांनाच भुरळ पाडत आलेली आहे. अनेक राजघराण्यांत ती आलेल्या पाहुण्यांना मौल्यवान भेट म्हणून द्यायची प्रथा होती. त्यामुळेच ती सगळ्या जगात सर्वदूर पसरायला मदत झाली असणार.
अशा काश्मिरी कशिदाकारीमध्ये शक्यतो वेगवेगळ्या रंगांच्या अनेक छटांची पाना-फुलांची नक्षी असते, हे या शैलीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या प्रकारात प्राणी-पक्षी किंवा मनुष्याकृती फारशा दिसत नाहीत. यात संपूर्ण कपड्यावर बारीक वेली विणलेल्या असतात. हीच कशिदाकारी जर कुर्त्यांच्या काडावर केलेली असेल तर गळ्याभोवती आणि बाह्यांना नाजूक साखळी टाक्याच्या वेलींची वेगळी उठावदार नक्षी विणलेली असते. साड्यांवरही ही नक्षी वेगवेगळ्या प्रकारे विणलेली असते. अर्थातच या कपड्याची नंतर शाल होणार आहे की साडी की कुर्ता की आणखी काही हे आधी ठरवूनच ही नक्षी विणलेली असते हे विशेष.
अमृता देशपांडे