चार वर्षांत 82 मृत्यू : साडे सहा हजार घटनांची नोंद
नागरिकांमध्ये अग्नीरोधक यंत्रांबाबत जागरुकतेचा अभाव असल्याचे उघड
– प्रकाश गायकर
पिंपरी – गेल्या तेरा वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल 6 हजार 719 आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अवघ्या चार वर्षामध्ये 82 निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 71 जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. शहरामध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्याबरोबरच झोपडपट्टी भाग देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. असे असताना नागरिकांकडून अग्नीरोधक यंत्राबाबत जागरुकता नसल्याने मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत.
शहर आणि उपनगरामध्ये वारंवार आगीच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट, अयोग्य विद्युत जोडणीमुळे आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात घेता विद्युत जोडणी, उपकरणे, वायरिंग याबाबत अधिक सजग असणे आवश्यक आहे. विद्युत उपकरणानुसार किती क्षमतेचा विद्युत प्रवाह लागणार आहे, याची तपासणी करून त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घेणे आवश्यक आहे. मात्र याबाबत शहरवासियांमध्ये अनास्था जाणवते. रहिवाशांकडून अग्निरोधक यंत्रणेची तपासणी केली जात नाही. विशेषतः तपासणी होत नसल्याने यंत्रणा सुरू आहे की बंद याबाबत माहिती मिळत नाही. परिणामी ऐनवेळी दुर्घटना घडल्यास यंत्रणा नादुरुस्त असेल तर धोका वाढतो.
शहरामध्ये 2015-16 या वर्षामध्ये 566 आग व इतर घटना घडल्या. त्यामध्ये 20 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर 2016 -17 या वर्षी 572 घटनामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. 2017-18 या वर्षी 645 घटना घडल्या त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. 2018-19 या वर्षात तब्बल 772 ठिकाणी आग लागली. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. 2019-20 या वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंत 451 घटना घडल्या आहेत. तर 2007 या वर्षापासून डिसेंबर 2019 पर्यंत 6 हजार 719 आगीच्या घटना घडल्या आहेत.
शहरात ज्या इमारतींना मालमत्ता कर लागू होतो, अशा लाखभर इमारती आहे. या इमारतीमध्ये सुमारे पंचवीस हजार इमारती सात मजल्याहून उंच आहे. येथे प्रत्येकाने अग्निशमनचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र अग्निशमन दलाकडून वारंवार सूचना देऊनही या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी आगीच्या घटना घडल्यास या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा मदतीस येत नाही. परिणामी मदत कार्यात अडथळे येतात.
दुर्घटना घडू नये यासाठी काय केले पाहिजे
– विद्युत बटन, वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे हे वीजदाब क्षमतेला अनुरुप तसेच आयएसआय प्रमाणित असावेत.
– त्यांची जोडणी कुशल व अधिकृत तंत्रज्ञान अवगत असलेल्यांकडूनच करून घ्यावी.
– मीटर केबिनसह, ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, तेथे मेन स्विच तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत.
– किचनमध्ये गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी-जास्त असू शकते. हे पाहता तेथील वायरिंग, विद्युत बटन, विद्युत उपकरणांची तपासणी नियमित करावी.
– उंच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती महत्त्वाची असते. वर्षांतून दोनदा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती केली तर हीच यंत्रणा शहराला आगीपासून वाचवू शकते.
– इमारतीमध्ये फायर हॉस, हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, ऍटोमॅटिक स्प्रिक्लंर सिस्टिम असणे आवश्यक आहे. तसेच ही यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आग लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. घरातील इलेक्ट्रीक वस्तूंची तपासणी केली पाहिजे. रात्रीच्या वेळी स्वयंपाक घराची एक तरी खिडकी उघडी ठेवली पाहिजे. जेणेकरुन गॅस गळती झाली तर स्फोट होणार नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी. तसेच विनाकारण कचरा पेटविणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कचरा पेटवू नये. सोसायट्यांमध्ये आवश्यक असलेली अग्निरोधक यंत्रणा बसवून घ्यावी. त्याची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करावी.
– किरण गावडे, प्रमुख, अग्निशामक विभाग, पिं.चिं. महापालिका.