पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनयुक्त पाणी थेट नदीत
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर
एम. डी. पाखरे
आळंदी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने आळंदी (ता. खेड) मधून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगूनवर आल्याने काहीकाळ काश्मिरसारखे दृश्य नदीपात्रात दिसून येत होते. मात्र इंद्रायणीचे रसायनयुक्त पाणी पाहून भाविकांनी तसेच आळंदीकरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
इंद्रायणीच्या उगमापासून इंद्रायणी अतिशय स्वच्छ पाणी घेऊन वाहते. जसजशी ती पिंपरी-चिंचवड आणि देहू आळंदीच्या दिशेने वाहत येते, तसतसे शहरातील नाल्याचे पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे नदीचे पाणी बदलू लागते. आळंदीपर्यंत येईस्तोवर इंद्रायणी नदीचे रूपांतर नाल्यात होते. ठिकठिकाणी वाढलेली जलपर्णी दिसते. त्यातच सोमवारी (दि. 23) पहाटे नदीवर दुर्गंधीयुक्त पांढरा फेस येत आहे. यामुळे नदीमधील जलचर पूर्णपणे नष्ट झाले असून नदी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. दरम्यान, हा पांढरा फेस काही आजचा नाही तर या दोन-तीन वर्षांत सातत्याने हा प्रकार उघडकीस येत असल्याने पिंपरी-चिंचवडकरांचे पाप आळंदीतील नागरिक भोगत असल्याचा आरोप आळंदीकरांनी केला आहे.
काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी राजकीय मंडळींना सांगण्याऐवजी आपण स्वतः सुरुवात करून नदी स्वच्छतेचा जागर सुरु केला. मात्र त्यालाही म्हणावे तसे यश मिळत नाही. सर्व पातळ्यांवर समान प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत ही मोहीम पूर्ण यशस्वी होणार नाही. राजकीय पातळीवरील आरोप – प्रत्यारोपामुळे मूळ विषयाला कायम बगल मिळाली आहे. स्वच्छ, सुंदर आणि पवित्र इंद्रायणी नदीकेवळ बोलण्यापुरती उरली आहे. या सगळ्यात नदी अखेरचा श्वास घेत आहे हे मात्र नक्की!
नदी की नाला?
संत तुकाराम महाराजांच्या देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमधून लाखो वैष्णवांचे पापक्षालन करून अविरत धावणाऱ्या इंद्रायणी नदीची आज अवस्था अतिशय बिकट आहे. नाल्यांचे पाणी, नदी काठावरील प्रदूषण, त्यातून निर्माण होणारी जलपर्णी आणि दुर्गंधीयुक्त फेस यामुळे इंद्रायणी नदी आहे की नाला हा यक्षप्रश्न सध्या उभा आहे. भक्ती रसाने ओतप्रोत होऊन वाहणारी नदीचे दुर्गंधीयुक्त नाल्यात रुपांतर झाले असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिक जबाबदार असल्याचा थेट आरोप नागरिकांसह भाविकांनी केला आहे.
भाजपवर शरसंधान
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचे प्रदूषण म्हणजे पिंपरी पालिकेचे पाप आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडचे कान 2017मध्ये टोचले होते. त्यावेळी व आताही पिंपरी-चिंचवड महापालिकेसह आळंदी नगरपालिकेवर भाजपचेच वर्चस्व असूनही ही स्थिती “जैसे थे’ असल्याने भाजप केवळ आश्वासनाचे गाजर देण्यात पटाईत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाल्याचा थेट आरोप विरोधकांसह नागरिकांनी केला आहे.