गयाना – आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला. मात्र, हा पराभव खूप खास होता कारण दोन वर्षांपूर्वी बांगलादेशने भारताचा पराभव केला होता व त्यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंनी केलेले गैरवर्तन चांगलेच वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या याच वर्तनाचा वचपा भारताच्या युवा संघाने काढला व हिशेब चुकता केला.
उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला व विक्रमी दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अन्य लढतीत ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला, तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवताना अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
आता येत्या बुधवारी भारताचा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघाचेच पारडे जड राहणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात मंगळवारी होणार आहे.
स्पर्धेदरम्यान झाला भूकंप
या स्पर्धेत झिम्बाब्वे आणि आयरर्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान भूकंप झाला व सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. सुरुवातीला कोणालाही काय झाले ते समजलेच नाही, पण नंतर हा भूकंप असल्याचे लक्षात आल्यावर सगळेच भयभीत झाले. झिम्बाब्वेची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात जवळपास 20 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे कोणतेही नुकसान झालेले नसले तरीही खेळ काही काळ थांबवावा लागला. या सामन्यात झिम्बाब्वेने 48.4 षटकांत सर्वबाद 166 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना आयर्लंडने 32 षटकांत 2 गडी गमावून 169 धावा केल्या व सामना जिंकला.