विशाल वर्पे
केंदूर- केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटामधील चौदा ग्रामपंचायतींपैकी तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने पाबळ, वढू बुद्रूक आणि जातेगाव बुद्रूक गावात सरपंचपदाच्या निवडणुकीत खळबळ झाल्यामुळे प्रस्थापितांना पडले भारी गाव कारभारी अशी जोरदार चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या पाबळ गावच्या सरपंचपदी शिवसेनेचे सोपान जाधव यांच्या गटाचे मारुती ज्ञानेश्वर शेळके यांची सरपंचपदी तर राजाराम दादाभाऊ वाघोले यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या गावात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या जातेगाव बुद्रूकमध्ये पवारांनी राजकीय खेळी करत ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली. जातेगाव खुर्दमध्ये प्रस्थापितांना धक्का देत युवकांनी सत्ता मिळवत वैशाली एकनाथ मासळकर यांना सरपंचपदी तर विकास रामभाऊ मासळकर यांना उपसरपंचपदी संधी मिळाली आहे. करंदीमध्ये अतिक्रमण अधिकारी सुहास ढोकले यांनी राजकीय डावपेच आखून सभापती शंकर जांभळकर गोरक्ष ढोकले, दिलीप ढोकले, संतोष ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीवर पुन्हा वर्चस्व मिळवले. यामध्ये सुभद्रा कांतीलाल ढोकले यांची सरपंचपदी आणि बबन उर्फ बबलू सोमनाथ ढोकले यांची उपसरपंचपदी वर्णी लागली. धामारी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. संपत कापरे, दत्ता भगत, सुनील गायकवाड यांच्या गटाला यश मिळाल्याने स्वाती डफळ सरपंच तर रेखा गायकवाड उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. मुखईमध्ये प्रस्थापितांना रोखण्यात अतुल धुमाळ, सुरेश रामचंद्र पलांडे, सुरेश रामराव पलांडे, सुदाम थोरवे यांना यश आले. तर ज्योती सचिन पलांडे सरपंचपदी तर रमेश रामचंद्र पलांडे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे. पिंपळे जगतापच्या निवडणुकीत पंडित थिटे, विठ्ठल जगताप, दीपक बेंडभर, शिवाजी जगताप यांनी राजकीय डावपेच आखून निसटलेली सत्ता काबीज केली. यामध्ये सोनल नाईकनवरे यांची सरपंचपदी तर सागर शितोळे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे. हिवरे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली. सरपंचपदी शारदा गायकवाड आणि उपसरपंचपदी दीपक खैरे यांची वर्णी लागली आहे. खैरेनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप खैरे, उपसरपंचपदी वर्षा सातपुते यांना संधी मिळाली. खैरवाडीच्या स्वाती विजय पवार सरपंच झाल्या तर नंदकिशोर गोडसे उपसरपंच झाले.
आपटीच्या सरपंचपदी रुपाली ढगे उपसरपंचपदी रेणुका गाडेकर यांची वर्णी लागली.
केंदूरचीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली मात्र एकाच गटाला पूर्ण बहुमत मिळाल्याने सरपंच, उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. सुवर्णा थिटे सरपंचपदी आणि उपसरपंचपदी भरत साकोरे यांना प्रथम संधी मिळाली.
दरम्यान सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या वढू ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या मात्र माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या नेतृत्वाखाली एकाच पॅनेलला चौथ्यांदा यश मिळाल्याने गावच्या राजकारणात प्रफुल्ल शिवले यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सरपंचपदी अनिल शिवले आणि उपसरपंचपदी हिरालाल तांबे यांना संधी मिळाली आहे.