नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बऱ्याच राज्यातील दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले होते. त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर झाला आहे.
एप्रिल महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची पूर्ण आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी विभाग शुक्रवारी जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र बरेच व्यवहार बंद असल्यामुळे ही पूर्ण आकडेवारी जाहीर करणे बरोबर होणार नाही असे या विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याच कारणामुळे गेल्या वर्षी एप्रिल महिन्याची औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. सांख्यिकी विभागाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, बऱ्याच राज्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे उद्योग आणि व्यवसाय बंद करण्यात आले होते.
त्यामुळे या क्षेत्रांनी या काळात उत्पादन शून्य पातळीवर असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीमध्ये ही आकडेवारी जाहीर करणे बरोबर होणार नाही. त्याचबरोबर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातील आकडेवारीही अशाच प्रकारची होती. त्यामुळे तुलना करणे अवघड आहे.
गेल्या वर्षी 25 मार्च रोजी केंद्र सरकारने संसर्ग टाळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लॉक डाऊन सुरू केले होते. या वर्षी याच काळात राज्यांनी निर्बंध लागू केले होते. मात्र आता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे जून महिन्यापासून औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निर्बंधाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे.