नवी दिल्ली – केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन तब्बल 3.1 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ एक टक्क्याने वाढले होते. एप्रिल ते सप्टेंबर या काळात औद्योगिक उत्पादन 23.5 टक्क्यांनी वाढले.
गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 20.8 टक्क्यांनी कमी झाले होते. आता खात्रीने उद्योग क्षेत्रावरील करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याचे उद्योगाच्या संघटनांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात खान क्षेत्राची उत्पादकता 8.6 टक्क्यांनी तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 2.7 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यानच्या काळात मनुफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स वाढत आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यामध्ये सर्व क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येतील आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढेल असे समजले जाते.
एकीकडे औद्योगिक उत्पादन वाढत असल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच महागाईची आकडेवारी मात्र चिंता निर्माण करीत आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढवून 4.48 टक्के इतका नोंदला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 4.35 टक्के इतका होता. दरम्यानच्या काळात अन्नधान्याच्या किमती वाढल्या असल्यामुळे या महागाईचा दर वाढला असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंक पतधोरण समिती व्याजदर निश्चित करण्यासाठी किरकोळ किमतीवरील महागाईच्या आकडेवारीचा विचार करते. बॅंकेने या महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखायचे ठरविले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून मगाईचा दर त्यापेक्षा जास्त पातळीवर आहे. हा दर आणखी वाढल्या नंतर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकते.