तातडीने उपाययोजना करण्याची गरज वाढली : वाहन विक्रीत झाली घट
वाहन उद्योगाची निर्यात केवळ 4 टक्केच
पुणे – भारत सरकारने 5 वर्षांत अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट ठवले आहे. मात्र, यासाठी वाहन उद्योगाचा विस्तार 14 टक्क्यांनी होण्याची गरज असल्याचे वाहन उद्योगाने म्हटले आहे; अन्यथा हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही.
सध्याची परिस्थिती पाहता फार मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या तरच वाहन क्षेत्राची उत्पादकता या पातळीपर्यंत पोहोचू शकते, असे महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका सांगितले. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन विक्री कमी झालेली आहे.
सध्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाहन उद्योगाचे योगदान केवळ 7 टक्के आहे. जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया या वाहन उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलेल्या देशातील वाहन उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचबरोबर भारताच्या एकूण निर्यातीत वाहन उद्योगाची निर्यात केवळ 4 टक्के आहे. ते प्रमाण 10 टक्केच्या पुढे जाण्याची गरज आहे. तरच या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढेल आणि अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरची होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून या उद्योगाने भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान केले आहे. मात्र, दोन वर्षांपासून परिस्थिती बिघडलेली आहे. वाहन उद्योग व सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान 12 टक्के अपेक्षित धरले आहे. तरच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान 1 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढवू शकेल. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वाहन उद्योगाचा मोठा वाटा पाहता या 5 वर्षांत वाहन उद्योगाचा विकास दर 14 टक्के असणे अपेक्षित आहे.
पवन गोयंका, महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक