नवी दिल्ली : सध्या देशात पावसाने लपाछपी चा खेळ सुरु केला आहे. कुठे पाऊस तर अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत. दरम्यान यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाला असल्याने उन्हाळी शेती पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने यावर्षी ऑगस्ट महिन्यात आठ टक्क्यापर्यंत पावसाची तूट अपेक्षित धरली होती. यापूर्वी सर्वात कमी पाऊस 2005 च्या ऑगस्ट महिन्यात झाला होता. 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात 191.2 मिमी (7.5 इंच) इतका पाऊस झाला होता. दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या कमतरतेमुळं तांदूळ आणि सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं किंमतीत वाढ होऊन महागाई वाढण्याची शकता आहे. भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागात कमी पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान हे 1901 नंतर यावर्षी सर्वात कमी झाले आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होऊ शकतो. उन्हाळ्यात पेरणी केलेल्या पिकांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. मान्सून हा घटक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण अकूण पावसाच्या सुमारे 70 टक्के पावसाचे पाणी हे शेती पिकांना दिलं जाते. त्यासाठी नदी, नाले, धरण यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केला जातो. यावर्षी देशातील पश्चिम आणि मध्य भागात कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी 180 मिमी (7 इंच) पेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंतचा पाऊस आणि उर्वरित महिन्यात पावसाचे प्रमाण नेमके कसे असेल तसेच ऑगस्टमधील एकूण पावसाची स्थिती काय असेल याबाबतची माहिती 31 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबरला हवामान विभागाकडून देण्यात येणार आहे. भारताला ऑगस्टच्या पहिल्या 17 दिवसांत फक्त 90.7 मिमी (3.6 इंच) पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्यपेक्षा जवळपास 40 टक्के कमी आहे. एका महिन्याची सामान्य पावसाची सरासरी ही 254.09 मिमी (10 इंच) आहे. एल निनोमुळे पाण्याचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भारतीय उपखंडात सामान्यतः पावसाला अडथळा निर्माण होतो. यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा 10 टक्के पाऊस कमी झाला आहे. परंतू, जुलैच्या पावसाने चांगला पाऊस झाला होता.