चेन्नई – बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले मिचौंग चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सोमवारी धडकले. यामुळे मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते आणि घरं पाण्याखाली बुडाली आहेत.
चक्रीवादळापूर्वीच तामिळनाडूत रविवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच चेन्नईतील चेंबरमबक्कम तलावातून ६ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळी ३ वाजल्यापासून मुसळधार पाऊस चालू आहे. तमिळनाडूचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. एस. एस. आर. रामचंद्रन यांनी चक्रवादळामुळे राज्यात आतापर्यंत सहा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. रामचंद्रन महणाले, बस अपघातात हे सहा बळी गेले आहेत. झाड पडून, पूर किंवा वीज पडून कुठेही जीवितहानी झालेली नाही.
चेन्नईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू असून सोमवारी सकाळी ईस्ट कोस्टल रोडवरील एक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात उद्या, मंगळवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच लोकांनी घरून काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय चेन्नई विमानतळावर उतरणारे 33 विमाने बंगळुरू विमानतळाकडे वळण्यात आले आहेत. तसेच अनेक रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र जे चक्रीवादळ ‘मिचॉंग’ मध्ये तीव्र झाले असून ते उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.