लाहोर- भारतीय विमानांसाठी 15 मे रोजी हवाई हद्द खुली करण्याबद्दल पाकिस्तानकडून विचार केला जात आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानकडून हा विचार केला जात आहे, असे नागरी हवाई वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र भारतातील निवडणूका पूर्ण होईपर्यंत ही स्थिती कायम ठेवली जाईल, असे वरिष्ठ मंत्र्याने सूचित केले आहे.
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्दीचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. मात्र 27 मार्च रोजी पाकिस्तानने ही हवाई हद्द अंशतः खुली केली. केवळ नवी दिल्ली, बॅंकॉक आणि कुआलांपूरच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद ठेवण्यात आली होती.
भारतीय विमानांसाठी हवाई हद्दीच्या वापरावरील बंदी उठवायचा का नाही याबाबतच्या निर्णयासाठी 15 मे रोजी बैठक होईल. या बैठकीला सर्व संबंधित मंत्रालयांचे मंत्री आणि अधिकारी या बैठकीत सहभागी होतील, असे पाकिस्तान हवाई वाहतुक प्राधिकरणाचे प्रवक्ते मुज्ताबा बेग यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि प्रांतीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी मात्र भारतातील निवडणूका होईपर्यंत ही बंदी हटवली जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.