सिडनी – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. याप्रकरणी भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने देखील संताप व्यक्त केला आहे.
हा तर असभ्य वर्तनाचा कळस असून वर्णद्वेषी टीका कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही. आता क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांनी याबाबत आयसीसीवर दडपण टाकावे, असे आवाहनही त्याने केले आहे.
या घटनेकडे आयसीसीने गांभीर्यतापूर्वक लक्ष घालायला पाहिजे. तसेच वर्णद्वेष करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. असे झाले तरच अशा घटना रोखल्या जातील, असेही कोहलीने सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी महंमद सिराज व जसप्रीत बुमराह यांना प्रेक्षकांनी केलेल्या वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला. तसेच चौथ्या दिवशी सिराजला पुन्हा एकदा अशाच घटनेचा सामना करावा लागला होता.
याबाबतत भारतीय संघाने पंचांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला आणि गैरवर्तन करत असलेल्या काही प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढण्यात आले व त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला होता.