खालापूर, (वार्ताहर) – कोकण आणि रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. राज्यकर्त्यांनी फक्त समाजाचा मतदाना पुरता वापर केला असून समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे.
खालापूर, गोळेवाडी येथील जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ऑल इंडिया धनगर महासंघ कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश उघडे, उपाध्यक्ष सुनील कोकळे, डॉ. राजाराम हुलवान, मारुती गोरड, अनंता हिरवे, माजी अध्यक्ष आनंदराव कचरे,
रामचंद्र पुकळे, ओमकार कुचेकर, कळंबोली शहर अध्यक्ष अरुणा दडस, माजी सरपंच खालापूर तालुका अध्यक्ष किरण हिरवे, महादेव कारंडे, नथुराम ढेबे, बाळकृष्ण आखाडे, विठ्ठल जांगळे, नरेश आखाडे, गणेश बावदाने, मंगेश बावदाने, प्रकाश बुरगले, सतीश बंडगर, आशिष स्वामी, प्रफुल्ल जंगम, संजकुमार गोरड, सुरेश घाटे, महादेव घाटे आदी उपस्थित होते.
कोकणासह रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत तालुक्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ता वीज आणि पाण्याची सोय नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून एकीकडे ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव साजरा केला. परंतु, धनगर समाजाचा आजही विकास झाला नाही. समाज शिक्षणापासून वंचित आहे. ७५ वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच आहे, असे काकडे म्हणाले.